अन् तो दिसेल त्याला चावत सुटला, पिसाळलेल्या कुत्र्याचा पुण्यात हैदोस, 40 जखमी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
चाकणमधील आंबेठाण रस्त्यावर पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 40 जण जखमी, लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना पुणे व पिंपरी चिंचवड येथे धाव घ्यावी लागली. भीतीचे वातावरण.
जो दिसेल त्याला चावत सुटला होता. त्याला काहीच सुचत नव्हतं. त्याच्या येण्यामुळे अख्खं चाकणं हादरलं होतं. माणसं, लहान मुलं, वयोवृद्ध, महिला इतकंच नाही तर इतर प्राण्यांनाही त्याने चावा घ्यायला सुरुवात केली. ही भीषण परिस्थिती पुण्यातील चाकण इथल्या आंबेठाण रस्त्यावरची आहे. लहान मुलावर, भाजी आणायला गेलेल्या महिलेवर किंवा रस्त्याने चालणाऱ्या वृद्धावर तो कुत्रा थेट झडप घालत होता.
कुणाला काही समजायच्या आतच त्याचे चावा घ्यायला सुरुवात केली. लोकांमध्ये भीती आणि जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू झाली. कुत्र्याने जणू अख्ख्या शहरात हैदोस माजवल्यासारखं झालं होतं. घराबाहेर पडणंही कठीण झालं.
पिसाळलेला कुत्रा पुढे महात्मा फुले चौक, श्री शिवाजी विद्यामंदिर आणि मार्केट यार्ड परिसरात पोहोचला. त्याने केवळ माणसांनाच नाही, तर रस्त्यावरच्या इतर भटक्या कुत्र्यांनाही चावा घेतला होता. पालिकेकडून या कुत्र्यांसाठी काहीच होत नसल्याने अखेर संतापलेल्या नागरिकांनी नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या कुत्र्याला ठार मारलं. संकट तिथेच टळलं नाही.
advertisement
त्याने ज्या कुत्र्यांना चावा घेतला ते इतर कुत्रे आता हल्ले करत सुटले आहेत. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चाकणमधील 40 जण जखमी झाले आहेत. तर इतर पिसाळलेल्या कुत्र्यांनी पाच जणांना चावा घेतला. जखमी लोक रुग्णालयात गेले तिथे क्रूर थट्टा सुरू झाली. इंजेक्शनचा साठा शिल्लक नसल्याने त्यांना पुणे आणि पिंपरी चिंचवड इथे रेफर करण्यात आलं. प्रशासकीय अनास्थेमुळे त्यांच्या वेदनांमध्ये अधिकच भर पडली. रक्ताने माखलेले कपडे, शरीरातून वाहणारं रक्त आणि पिसाळलेला कुत्रा चावल्याने मनात बसलेली ती अनामिक भीती घेऊन ४० नागरिक हतबल होऊन चाकण ग्रामीण रुग्णालयात धावले.
advertisement
मात्र, तिथे गेल्यावर कळलं की सरकारी दवाखान्यात साधी रेबीजची लस उपलब्ध नाही. वेदनेने विव्हळणाऱ्या लहान मुलांना आणि रक्ताळलेल्या वृद्धांना घेऊन त्यांच्या नातेवाइकांना पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात किंवा पुण्याच्या ससून रुग्णालयात धाव घ्यावी लागली.
सायंकाळी उशिरा चाकण ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्ध झाली असली, तरी तोपर्यंत तासनतास सोसलेल्या त्या मरणयातनांनी नागरिकांच्या संतापाचा कडेलोट केला होता. "आम्ही टॅक्स भरतो, मग संकटाच्या वेळी आम्हाला औषध का मिळत नाही?" असा संतप्त सवाल विचारला जात असतानाच दुसरीकडे शासन मात्र पर्यटनस्थळांवर कुत्र्यांच्या बंदीचे 'जीआर' काढण्यात व्यस्त होतं. या कुत्र्यांमुळे घराबाहेर पडणंही मुश्कील झालं आहे. घराबाहेर पडतानाही भीती वाटत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 8:01 AM IST







