Pune News : किराणा भरण्यावरून वाद टोकाला, प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले, नेमकं काय झालं?
Last Updated:
Grocery Purchase Couple Fight : किराणा भरण्याच्या वादामुळे पती-पत्नीतील मतभेद इतके भडकले की प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत पोहोचले. दोघांमध्ये तंटा गंभीर स्वरूपाचा झाला, कोर्टातही सुनावणी झाली.
पुणे : किराणा का भरत नाहीस या साध्या वाक्यामुळे सुरु झालेला वाद एका चाळिशीच्या दाम्पत्यासाठी मोठा तणाव बनला होता. विश्वास आणि विनया (नावे बदलली आहेत) यांचा संसार 2000 मध्ये सुरळीत सुरु झाला होता. विश्वास फर्निचर व्यवसायात कार्यरत आहे, तर विनया गृहिणी आहे. त्यांचा मुलगा सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे आणि मुलगी शाळेत जाते. सुरुवातीला संसार सुरळीत चालत होता कारण विश्वासची आई घरखर्चात मदत करत होती. मात्र, तिच्या निधनानंतर दोघांमध्ये घरखर्चाच्या कारणाने वाद वाढू लागले.
कोर्टात गेलं किराणा प्रकरण
पत्नीने आपल्या पतीवर 'किराणा का भरत नाही' अशी तक्रार केली. त्यावरून दोघांमध्ये वाद पेटला आणि रागाच्या भरात पतीने न्यायालयात विभक्तीचा अर्ज केला. याचबरोबर पत्नीने तात्पुरत्या पोटगीसाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला. कौटुंबिक न्यायालयाने पत्नीचा अर्ज मान्य करत तिला आणि मुलीला दरमहा सात हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश दिला. परंतु, पतीने तीन वर्षे पोटगी दिले नाही. परिणामी, दोन लाख अठरा हजार रुपयांची थकीत पोटगी मिळावी यासाठी पत्नीच्या वकिलांनी न्यायालयात मागणी केली. या वादामुळे दोघांमध्ये विभक्ती, पोटगी आणि थकीत पोटगी असे तीन स्वतंत्र दावे न्यायालयात सुरू झाले होते.
advertisement
कौटुंबिक न्यायालयाने प्रकरण समुपदेशनासाठी पाठवले. पत्नीतर्फे अॅड. भाग्यश्री गुजर-मुळे आणि पतीतर्फे अॅड. प्रियांका जहागीरदार यांनी प्रकरण सांभाळले. समुपदेशक शानूर शेख यांनी दोघांशी संवाद साधून त्यांच्या मतभेदांची मूळ कारणे शोधली आणि दोघांमधील कटुता कमी करण्याचा प्रयत्न केला. समुपदेशकांनी विशेष करून मुलांच्या भवितव्यासाठी एकत्र राहण्याचे महत्त्व पटवले.
समुपदेशनाचा परिणाम सकारात्मक ठरला. विश्वास आणि विनयाने एकमेकांविरोधातील तक्रारी मागे घेण्याचे ठरवले. पतीने पत्नीला घरखर्चासाठी दरमहा सात हजार रुपये देण्यास, वर्षभरातील थकीत पोटगीचे दोन लाख रुपये फेडण्यास तयार असल्याचे सांगितले. तसेच, पत्नीचे गहाण ठेवलेले बारा तोळे सोने परत देण्याची तयारी केली आणि मुलीच्या शिक्षण तसेच भविष्याच्या विवाहाच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारली. पत्नीने देखील पतीविरोधातील सर्व दावे मागे घेण्यास सहमती दर्शवली.
advertisement
अशा प्रकारे, किराणा भरण्यापासून सुरु झालेला वाद न्यायालयाच्या समुपदेशनामुळे सामंजस्यपूर्ण मार्गाने मिटवता आला. विश्वास आणि विनयाने पुन्हा एकत्र येऊन नात्याची उसवलेली वीण पुन्हा सांधण्याचा निर्णय घेतला. समुपदेशनाचा हा अनुभव दाखवतो की, लहानसहान मतभेदांवर तंटा पेटल्यासही, संवाद आणि तटस्थ मार्गदर्शनाने संसार आणि नात्याला दुसरा जीवन मिळू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 10:26 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : किराणा भरण्यावरून वाद टोकाला, प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले, नेमकं काय झालं?