अवघ्या अर्ध्या तासात विरघळेल बाप्पाची मूर्ती; पुण्याच्या मूर्तीकारांना मिळालं भारतातलं पहिलच पेटंट
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
पुण्यातील मूर्तिकारांनी अर्ध्या तासात विरघळणारी बाप्पांची मूर्ती तयार केलीय. विशेष म्हणजे त्यांना भारतातील पहिलं पेटंट मिळालंय.
पुणे, 21 ऑगस्ट: गणेशोत्सव आता काहीच दिवसांवर आला आहे. त्यामुळे सर्व मूर्तिकार बाप्पांच्या आकर्षक मूर्ती घडवण्याचं काम करतायंत. अनेकजण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना प्राधान्य देतात. पण पुण्यातील मूर्तिकाराने शाडू मातीच्या पर्यावरणपुरक मूर्ती तयार केल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्यायी मिश्रण तयार केलं असून त्यांना गणपती मूर्ती बनवण्याचं पेटंटही मिळालं आहे. विशेष म्हणजे या मूर्ती केवळ अर्धा तासात पाण्यात विरघळून जातात. अभिजीत धोंडफळे हे अशी कामगिरी करणारे पहिलेच भारतीय मूर्तिकार ठरले आहेत.
पर्यावरणपुरक गणपती बनवण्याचं पेटंट
पुण्यातील मूर्तिकार अभिजीत धोंडफळे यांचा मूर्ती बनवणं हा परंपरागत व्यवसाय आहे. त्यांच्या मागील 4 पिढ्यांपासून शाडू मातीच्या मूर्ती बनवल्या जातात. ही परंपरागत कला त्यांनी जोपासली आहे. त्यांनी बनवलेल्या मूर्ती केवळ अर्धा ते पाऊण तासात पाण्यात विरघळून जातात. त्यामुळे भारत सरकारकडून पर्यावरणपुरक गणपती बनवण्याचं पेटंट धोंडफळे यांना मिळालं आहे.
advertisement
POP ला पर्याय 'रविंद्र मिश्रण'
पुण्यात 1940 पासून धोंडफळे कलानिकेतन कार्यरत आहे. त्यांची तिसरी पिढी आता कार्यरत आहे. तसेच मुलगी दीप्तीच्या रूपाने चौथी पिढीही बाप्पांच्या सेवेत कार्यरत आहे. यांच्या आजोबांनी केलेला पांगुळ अळीचा गणपती पर्यावरण पूरक पेपर पल्प पासून 1955 साली बनवण्यात आला होता. ती मूर्ती अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. त्यांच्या यां तिसऱ्या पिढीने एक पाऊल पुढे टाकत पर्यावरण पूरक गणपतीची चळवळ सुरु केली. त्यांनी प्लास्टर ऑफ परिसला पर्यावरणपुरक पर्याय तयार केला आहे. अभिजीत यांनी वडिलांच्या नावावरून या मिश्रणाचं नाव 'रवींद्र मिश्रण' ठेवलं आहे.
advertisement
पंतप्रधानांनी घेतली दखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मध्ये अभिजीत यांच्या पर्यावरणपुरक गणेशमूर्तींच्या चळवळीची नोंद घेतली. या चळवळीचा नावासकट 2016 साली त्यांनी उल्लेख केला. यातूनच प्रेरणा घेऊन एका नवीन मिश्रणाच्या अभ्यासास सुरुवात केली, अशी माहिती मूर्तीकार अभिजीत धोंडफळे यांनी दिली. अनेक माध्यम हाताळल्यानंतर आणि अनेक प्रयोग केल्यानंतर 2019 मध्ये मिश्रणास यश मिळाले. जुलै 2019 मध्ये पेटंट रजिस्ट्रेशन आणि 6 जून 2023 ला पेटंट ग्रँट झाल्याचे अभिजीत यांनी सांगितले.
advertisement
मिश्रणावर कशा केल्या चाचण्या?
या मिश्रणावर अनेक प्रयोग केले गेले आणि मग सिविल इंजिनिअरिंगच्या टेस्टिंग लॅब मध्ये कठीण टेस्टिंग केल्या. यात प्रामुख्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिस POP आणि शाडू माती यांच्या तुलनेत स्ट्रेंथ आणि इतर बाबींवर चाचणी केली. तसेच विरघळण्याचा कालावधी यावरही अनेक टेस्ट केल्या गेल्या. त्यातून या मिश्रणाची स्ट्रेंथ पीओपी पेक्षा चांगली आणि अर्थात शाडू माती पेक्षा जास्त मिळाली. तसेच या मिश्रणाचा पाण्यात विरघळण्याचा कालावधी खूपच कमी अगदी अर्धा तास असल्याचा निष्कर्ष आल्याचे मूर्तिकार सांगतात.
advertisement
मिश्रणात कुठल्या घटकांचा वापर?
अभिजीत धोंडफळे यांनी तयार केलेल्या रविंद्र मिश्रणात गाळाची माती, शाडू माती आणि सॉफ्ट राईस ब्रान म्हणजेच भाताचे मऊ तूस किंवा लाकडाचा बारीक भुसा हे घटक योग्य प्रमाणात घ्यावे लागतात. याची स्ट्रेंथ पीओपीच्या तुलनेत चांगली आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन किंवा वाहतुकीस सुरक्षित आहे. तसेच वजनाला शाडूच्या तुलनेत हलके आहे.
advertisement
विविध दृष्टीने फायद्याचे मिश्रण
रविंद्र मिश्रणाच्या मूर्तीवर रंगकाम बाकीच्या मूर्तींप्रमाणेच चांगले करता येते. इतर माध्यमांच्या तुलनेत यामध्ये अधिक रेखीव काम करता येते. हे मिश्रण शाडू माती पेक्षा लवकर सुकते. वजनाला शाडू मातीच्या तुलनेत हलके आहे. तसेच पूर्णपणे रसायन आणि रासायनिक क्रिया विरहित मिश्रण असल्याने विसर्जन केल्या नंतर झाडांना आणि कुंड्यांमध्ये आपण वापरू शकतो, असेही अभिजीत धोंडफळे यांनी सांगितले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 21, 2023 12:55 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
अवघ्या अर्ध्या तासात विरघळेल बाप्पाची मूर्ती; पुण्याच्या मूर्तीकारांना मिळालं भारतातलं पहिलच पेटंट