भारतातील असं गाव जिथे कोणीही घालत नाही चप्पल-बूट, पण का? काय आहे कारण?
- Published by:Devika Shinde
- trending desk
Last Updated:
सध्याच्या बदलत्या काळात अशा प्रकारे राहणं म्हणजे प्रतिगामी असल्याचं लक्षण मानलं जाऊ शकतं, मात्र गावातले स्थानिक श्रद्धेनं ही प्रथा जपत आहेत.
मुंबई : भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे. विविध संस्कृतींचे, विविध भाषा बोलणारे लोक देशात राहतात. देशात काही अनोख्या चालीरिती जपणारी गावंही आहेत. तमिळनाडूची राजधानी चेन्नईपासून 450 किलोमीटर अंतरावर असंच एक गाव आहे. या गावातले लोक पायात चप्पल-बूट घालत नाहीत. त्यामागे एक कारणही आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात वसलेली अनेक गावं आजही स्वतःची संस्कृती जपून आहेत. प्रत्येक गावाला स्वतःचा इतिहास, तिथली वेगळी संस्कृती व भाषाही असते. त्या गावाचा विकास होत असताना काही गोष्टी बदलतात, मात्र काही गावं त्यांची संस्कृती आणि तिथला इतिहास आजही जपून आहेत. तमिळनाडूमधलं एक गावही असंच आहे. तिथले रहिवासी पायात चप्पल किंवा बूट काहीच घालत नाहीत.
advertisement
सध्याच्या बदलत्या काळात अशा प्रकारे राहणं म्हणजे प्रतिगामी असल्याचं लक्षण मानलं जाऊ शकतं, मात्र गावातले स्थानिक श्रद्धेनं ही प्रथा जपत आहेत. चेन्नईपासून अंदाजे 450 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाचं नाव अंदमान असं आहे. गावातले बहुतांश लोक चप्पल, बूट घालत नाहीत. मुलं चपलेविनाच शाळेत जातात. पूर्वी तिथल्या लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता. आजही गावातील शेतकरी शेतात काम करताना चप्पल, बूट घालत नाहीत. काही जण तर कडक उन्हातही अनवाणी पायानंच चालतात.
advertisement
गावातले काही वृद्ध व ज्येष्ठ लोकच केवळ चप्पल घालतात. इतर बहुतांश लोक मात्र कोणत्याही ऋतूत अनवाणी पायानंच फिरतात. काही जण गावात फिरताना चप्पल हातात घेऊन चालतात, मग गावाच्या सीमेबाहेर पडल्यानंतर चप्पल पायात घालतात.
काय आहे यामागचं कारण?
गावातल्या या अजब प्रथेमागे एक कारण आहे. मुथ्यालम्मा देवी ही गावाचं रक्षण करते, अशी गावातल्या स्थानिकांची श्रद्धा आहे. त्या देवीच्या सन्मानार्थ लोक गावात चप्पल किंवा बूट घालत नाहीत. गावाच्या सीमेबाहेर गेल्यावर मात्र ते चपला घालतात. गावात बाहेरून कोणी व्यक्ती आल्यास स्थानिक त्याला गावातल्या प्रथेची माहिती देतात. त्यावर त्या पाहुण्याची इच्छा असेल तर तो ती प्रथा पाळू शकतो. मात्र गावातले लोक त्याच्यावर प्रथा पाळण्याबाबत जबरदस्ती करत नाहीत. गावात आलेल्या पाहुण्यांवर त्याबाबत कोणताही दबाव नसतो. मात्र तिथे राहणारे लोक श्रद्धेनं ही प्रथा पाळतात. मार्च-एप्रिल महिन्यात या देवीचा तीन दिवसांचा उत्सव असतो. त्यावेळी तिथे भाविक मोठ्या संख्येनं येतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 02, 2024 10:08 PM IST










