केंद्र सरकारने PM Kisan पैसे वाढवले? २२ वा हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट आली समोर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
PM Kisan Yojana : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२६–२७ च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेसाठी ६३,५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
मुंबई : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२६–२७ च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेसाठी ६३,५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. मात्र ही तरतूद मागील वर्षाइतकीच ठेवण्यात आल्याने, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वार्षिक आर्थिक मदतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. परिणामी, शेतकऱ्यांना मिळणारी मदत पुढील वर्षीही दरवर्षी ६,००० रुपये इतकीच राहणार आहे.
पीएम किसान योजनेची पार्श्वभूमी
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०१९ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पात्र जमीनधारक शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये – प्रत्येकी २,००० रुपये – थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. सरकारच्या मते, या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना लागवडीपूर्वी आवश्यक खर्चासाठी किमान आर्थिक आधार देणे हा आहे.
advertisement
२२ वा हप्ता कधी मिळणार?
पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे योजनेचा २२ वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील वर्षीही फेब्रुवारीच्या अखेरीस हप्ता जारी करण्यात आला होता. त्यामुळे यंदाही त्याच धर्तीवर हप्ता मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
advertisement
अर्थसंकल्पात बदल नाही, नाराजी वाढली
२०२६ च्या अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेतील रकमेत कोणताही बदल न केल्याने शेतकरी संघटनांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर ६,००० रुपयांची वार्षिक मदत अपुरी असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी आणि इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली असताना, ही मदत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजा भागवू शकत नाही, असा त्यांचा आरोप आहे.
advertisement
मदत वाढवण्याची मागणी दुर्लक्षित
डिसेंबर महिन्यात अर्थसंकल्पपूर्व बैठकीत शेतकरी संघटना आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी पीएम किसान योजनेतील मदत किमान ९,००० ते १२,००० रुपये करण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीला अर्थसंकल्पात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष केल्याची भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे.
आतापर्यंतचा योजनेचा आढावा
सध्या देशभरातील सुमारे १० कोटी शेतकरी कुटुंबांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे. योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत केंद्र सरकारने ३.७० लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरित केली आहे. आतापर्यंत या योजनेचे एकूण २१ हप्ते जारी करण्यात आले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 03, 2026 11:58 AM IST







