होळीच्या आधी की नंतर? PM Kisan चा पैसे कधी जमा होणार? नवीन अपडेट आली समोर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
PM Kisan Yojana : देशातील मोठा वर्ग अजूनही शेतीवर अवलंबून आहे. मात्र बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील चढउतार यामुळे अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.
मुंबई : देशातील मोठा वर्ग अजूनही शेतीवर अवलंबून आहे. मात्र बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील चढउतार यामुळे अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेचे २१ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, आता सर्वांचे लक्ष २२ व्या हप्त्याकडे लागले आहे.
२२ वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येईल, असा अंदाज आधी व्यक्त केला जात होता. मात्र फेब्रुवारी महिना संपत आला तरी सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून, हा हप्ता होळीपूर्वी मिळणार की सणानंतर, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
होळीपूर्वी हप्ता येण्याची शक्यता किती?
पीएम किसान योजनेचे हप्ते साधारणपणे दर चार महिन्यांनी वितरित केले जातात. या वेळापत्रकानुसार पाहता २२ वा हप्ता फेब्रुवारीत येणे अपेक्षित होते. मात्र कोणतीही अधिसूचना किंवा कार्यक्रम जाहीर न झाल्याने आता मार्चमध्येच हप्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सहसा इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यापूर्वी सरकारकडून अधिकृत सूचना दिली जाते. सध्या तशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने होळीपूर्वी हप्ता मिळण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तरीही सरकारकडून अचानक घोषणा होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.
advertisement
कोणाला मिळणार २२ व्या हप्त्याचा लाभ?
या योजनेचा लाभ देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळतो. २१ व्या हप्त्यावेळी ९ कोटींपेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली होती. यावरून या योजनेचा व्यापक प्रभाव स्पष्ट होतो. २२ व्या हप्त्यातही कोट्यवधी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
मात्र यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे आणि जमिनीची नोंदणी योग्य प्रकारे अपडेट केलेली आहे, अशा शेतकऱ्यांनाच हा हप्ता वेळेवर मिळणार आहे. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास हप्ता अडकण्याची शक्यता असते.
advertisement
शेतकऱ्यांनी काय करावे?
जर अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल, आधार लिंकिंग बाकी असेल किंवा बँक खात्याची माहिती चुकीची असेल, तर ती तात्काळ दुरुस्त करणे आवश्यक आहे. अनेक वेळा लहान तांत्रिक कारणांमुळेही हप्ता रोखला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली माहिती तपासून घ्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे.
पुढील घोषणा कधी?
सध्या २२ व्या हप्त्याबाबत सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. मात्र हप्ता लवकरच जाहीर होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवावे. हप्ता जाहीर होताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार असून, त्यामुळे लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 12:46 PM IST







