मातीसाठी झिजले! कृषी क्षेत्रातील ४ दिग्गजांचा पद्म पुरस्कराने होणार सन्मान, आहेत कोण?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील चार मान्यवरांची पद्म पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे.
मुंबई : कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील चार मान्यवरांची पद्म पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. शेती, रेशीम उत्पादन, कापूस संशोधन तसेच पशुपालन व दुग्धव्यवसाय या विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या या व्यक्तींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली आहे. या यादीत उत्तर प्रदेश, आसाम, महाराष्ट्र आणि तेलंगणा येथील शेतकरी व पशुपालकांचा समावेश असून त्यांचे कार्य आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
श्रीरंग लाड
प्रगतीशील शेतकरी आणि कृषी नवोन्मेषक श्रीरंग देवाबा लाड यांची पद्म पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. ‘दादा लाड कापूस तंत्र’ विकसित करून त्यांनी कापूस उत्पादनात क्रांती घडवून आणली. या तंत्रामुळे बियाणे कापसाचे उत्पादन तब्बल ३०० टक्क्यांनी वाढले असून हजारो शेतकऱ्यांचे उत्पन्न ४० टक्क्यांहून अधिक वाढले आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन आणि शाश्वत शेती हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य उद्देश होता.
advertisement
रघुपत सिंग
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील बिलारी गावचे रहिवासी रघुपत सिंग यांची शेती क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मरणोत्तर पद्म पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. रघुपत सिंग यांनी शेतीतील जैवविविधता जपण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. संकटात सापडलेल्या आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ५५ पेक्षा अधिक भाजीपाला पिकांचे त्यांनी जतन केले. केवळ लागवडच नव्हे, तर त्या पिकांच्या बियाण्यांचे संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी संरक्षण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. याशिवाय त्यांनी १०० हून अधिक नवीन वनस्पती आणि पिकांच्या जाती विकसित केल्या. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना यापूर्वी अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.
advertisement
जोगेश देउरी
आसाममधील प्रसिद्ध रेशीम शेतकरी जोगेश देउरी यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मुगा रेशीम उत्पादनाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात जोगेश देउरी यांचा मोठा वाटा आहे. मुगा रेशीम हा आसाममध्ये तयार होणारा दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण सोनेरी रेशीम असून त्याला जीआय टॅगही प्राप्त आहे. नैसर्गिक सोनेरी झळाळी, टिकाऊपणा आणि मजबुतीसाठी हा रेशीम ओळखला जातो. विशेष म्हणजे हा रेशीम रंगवावा लागत नाही आणि प्रत्येक धुण्याबरोबर त्याची चमक अधिक वाढते. जोगेश देउरी यांच्या प्रयत्नांमुळे अनेक स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले असून रेशीम उद्योगाला नवी दिशा मिळाली आहे.
advertisement
रामा रेड्डी मामिदी
तेलंगणातील प्रसिद्ध पशुपालक रामा रेड्डी मामिदी यांना पशुपालन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील योगदानासाठी मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे या भागातील दुग्धव्यवसायाचे आधुनिकीकरण झाले आणि अनेक शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्नाचा मार्ग मिळाला.
दरम्यान, पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन श्रेणींमध्ये दिले जातात. कला, समाजसेवा, विज्ञान, शिक्षण, शेती, उद्योग, वैद्यक, क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. दरवर्षी राष्ट्रपती भवनात औपचारिक समारंभात भारताचे राष्ट्रपती हे पुरस्कार प्रदान करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 8:41 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
मातीसाठी झिजले! कृषी क्षेत्रातील ४ दिग्गजांचा पद्म पुरस्कराने होणार सन्मान, आहेत कोण?










