किती दिवसांची मुदतवाढ?
सुरुवातीला नोंदणीची अंतिम तारीख ३० सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडे अद्याप पुरेसा कापूस उपलब्ध नसल्याचे लक्षात घेऊन ही मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे उशिरा येणाऱ्या हंगामामुळे चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, बोंडगळ, सडलेला कापूस आणि काढणी उशिरा होण्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांवर वाढलेला ताण आता काही प्रमाणात कमी होणार आहे.
advertisement
मोबाइल अॅपची सोय
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी यावर्षी भारतीय कापूस महामंडळाने 'कपास किसान मोबाइल अॅप' सुरू केले आहे. १ सप्टेंबरपासून या अॅपवर नोंदणीला सुरुवात झाली असून, राज्य शासन तसेच शेतकरी संघटनांच्या मागणीनंतर केंद्र सरकारकडून मुदतवाढ जाहीर करण्यात आली. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकऱ्यांना सहज नोंदणी करता येणार आहे आणि खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार आहे.
हवामानाचा फटका
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने व ढगाळ हवामानामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. पानगळ व बोंडगळ सुरू झाली आहे, तर काही ठिकाणी बोंडसळ व सडण्याची समस्या गंभीर झाली आहे. कापसाच्या बोंडांना फुटण्यासाठी किमान आठ ते दहा दिवस कोरड्या हवामानाचा ताण आवश्यक असतो. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून हा ताण न मिळाल्याने कापूस अजूनही काढणीला तयार झालेला नाही. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, या परिस्थितीचा उत्पादनावर थेट नकारात्मक परिणाम होणार आहे.
एचटीबीटी कापसाचे आव्हान
यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित एचटीबीटी कापसाची लागवड झाल्याचे समोर आले आहे. त्यावर वेळेत नियंत्रण आणल्यामुळे शेतकऱ्यांना अनपेक्षित फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, हवामानातील प्रतिकूल बदल, वाढता कीडरोगांचा प्रादुर्भाव आणि अपुरी सूर्यप्रकाशाची उपलब्धता या सर्व घटकांमुळे यंदाचा कापूस हंगाम अधिकच आव्हानात्मक ठरणार आहे.
भारतीय कापूस महामंडळाने नोंदणीसाठी दिलेली ही मुदतवाढ शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरणार आहे. उशिरा आलेल्या हंगामामुळे जे शेतकरी चिंतेत होते, त्यांना आता योग्य वेळेत नोंदणी करून हमीभावाचा लाभ घेता येईल. त्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांना या निर्णयातून दिलासा मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.