सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे फलोत्पादन शेतकरी तसेच पालेभाज्या पिकवणारे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
Weather Alert: राज्यात रविवारी मुसळधार पाऊस, 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील शेतकरी सुरेश शेळके यांनी अर्ध्या एकरात भेंडीची लागवड केली होती. बियाणे, फवारणी, औषधे इत्यादी मिळून 20 ते 30 हजार रुपये खर्च आला होता. परंतु वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे भेंडीवर चिकट्या, बुरशी, भेंडी गळणे, करपा इत्यादी रोग पडून भेंडीचे अतोनात नुकसान झाले आहे. बाजारात सध्या भेंडीला 500 रुपये कॅरेट दर मिळत आहे. परंतु या अवकाळी पावसामुळे भेंडीचे नुकसान झाले असून शेतकरी सुरेश शेळके यांना 1 ते 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
advertisement
सोलापूर जिल्ह्यातील 45 डिग्री अंश सेल्सिअसमध्ये शेतकरी सुरेश शेळके यांनी उसाला पाणी न देता भेंडीला पाण्याचे योग्य नियोजन केले होते. उन्हाळ्यात भेंडी जळून जाऊ नये म्हणून उसाकडे लक्ष न देता फक्त भेंडीकडेच शेळके यांनी लक्ष दिले होते. भेंडीवर कोणताही रोग पडू नये म्हणून दर पंधरा दिवसांनी फवारणी करत होते. अवकाळी पावसामुळे शेतातच भेंडी खराब झाली असून काळ्या मातीत केलेली मेहनत पाण्यात गेली आहे. सरकारने पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तरुण शेतकरी सुरेश शेळके यांनी केली आहे.