परभणी : राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आज परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शासनाच्या नवीन जीआर नुसार हेक्टरी साडे आठ हजारपेक्षा जास्त रुपयांची मदत मिळणार आहे. अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली आहे. शेतकऱ्यांकडून हेक्टरी मदतीमध्ये वाढ व्हावी अशी मागणी केली आहे. अशातच आता मंत्री मकरंद पाटील यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे..
advertisement
मदत वाढवण्याचे आश्वासन
मंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्याचे निकष लक्षात घेता, मदतीचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला जाणार असून, शेतकऱ्यांना कुठल्याही टप्प्यावर एकटे सोडले जाणार नाही. स्थानिक प्रशासनाकडून पंचनामे करून लवकरच मदत वाटप सुरू होईल.
उद्धव ठाकरे यांचाही दौरा
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मराठवाड्यातील बीड, धाराशिव, जालना, लातूर व परभणी जिल्ह्यांचा दौरा करून शेतकऱ्यांना धीर दिला. “माझ्या हातात काही नसले तरी मी तुमच्या पाठीशी आहे. कोणीही खचू नका, वेडवाकडे पाऊल उचलू नका,” असे आवाहन करत त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेऊ नये असे सांगितले.
ठाकरे यांनी यावेळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या. “मराठवाड्यात पहिल्यांदाच असं दृश्य दिसतंय. आधी दुष्काळाची झळ बसायची, पण आता पावसानेच सगळं उद्ध्वस्त केलंय. हे संकट खूप मोठं आहे. तुमची कर्जमाफीची मागणी योग्य आहे, पण या प्रसंगी मी त्यावर भाष्य करणार नाही, कारण ते राजकारण ठरेल. मात्र सरकारने जाहीर केलेली मदत २०२३ च्या निकषांनुसार आहे, जी परिस्थिती पाहता अपुरी आहे,” असेही ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर
गेल्या चार दिवसांत मराठवाड्यात मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला आहे. धाराशिव, बीड, जालना, लातूर आणि परभणी जिल्ह्यांतील शेतजमिनी, पिके व पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेल्या आहेत. कापूस, सोयाबीन, तूर यासारख्या हंगामी पिकांचे पूर्ण नुकसान झाले असून, पशुधन व घरांचेही नुकसान झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. शेतकऱ्यांचे अनेक वर्षांचे कष्ट पाण्यात गेल्याने हताशा वाढली आहे.