तीन जिल्ह्यांतील शेतकरी बाधित
गृह विभागाच्या माहितीनुसार, ही प्रकरणे प्रामुख्याने चंद्रपूर, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमधील आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत, भाजप आमदार अतुल भातखळकर आणि उमरखेडचे आमदार संजय मेश्राम यांच्यासह अनेक सदस्यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना गृह विभागाने ही माहिती दिली.
सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये सावकारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यांना किडनी विकावी लागत असल्याच्या तक्रारी, तसेच या माध्यमातून आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी अवयव तस्करीचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यावर उत्तर देताना गृह विभागाने तपासात काही गंभीर बाबी समोर आल्याचे मान्य केले.
advertisement
सोलापूरमधील मध्यस्थाचा पर्दाफाश
गृह विभागाच्या उत्तरानुसार, सोलापूर जिल्ह्यातील एका मध्यस्थाने किमान १६ जणांच्या किडन्या परदेशात विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधित व्यक्तीने स्वतःची किडनी सुमारे आठ लाख रुपयांना विकल्याचे तसेच इतर नऊ जणांची किडनी विकण्यात मध्यस्थी केल्याचे कबूल केले आहे. या प्रकरणातील काही पीडित परराज्यातील असल्याची माहितीही देण्यात आली. किडनी विक्रीसाठी कंबोडिया येथील रुग्णालयांचा वापर करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
चंद्रपूरमधील शेतकऱ्याची हृदयद्रावक कथा
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिथूर येथील रोशन कुडे या शेतकऱ्याने खासगी सावकाराकडून अवघे एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र व्याजाच्या जाचामुळे त्याच्याकडून तब्बल ४८.५३ लाख रुपये आणि एक एकर जमीन परतफेड म्हणून घेतली गेली. तरीही तगादा सुरूच राहिल्याने अखेर या शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी परदेशात जाऊन आपली किडनी विकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे.
आरोपींवर कारवाई
या संपूर्ण प्रकरणात सावकारी करणारे सहा जण तसेच किडनी खरेदी-विक्रीत सहभागी असलेले आणखी पाच जण असे एकूण अकरा आरोपी निष्पन्न झाले आहेत. यापैकी आठ जणांना अटक करण्यात आली असून एका आरोपीला फरार घोषित करण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती गृह विभागाने दिली.
