उन्हाळ्यात अशी घ्यावी फळबागेची काळजी
कडक उन्हाळ्यात आंबा, चिकू, संत्रा कलमे वाचवण्यासाठी कलमांच्या जोडावर शेवाळ ओले करून बांधावे. ते दर तिसर्या दिवशी ओले करावे. त्यामुळे कलम वाळण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. फवारा सिंचन पद्धतीत पाण्याचा वापर काटकसरीने होतो, मात्र भांडवली खर्च जास्त येतो. म्हणून सहकारी तत्त्वावर किंवा भाडेपद्धतीने ही सामग्री वापरणे सोईचे होईल. ठिबक पद्धत ही एक आधुनिक व अतिशय काटकसरीने पाणी वापरण्याची पद्धत आहे. यात थेंब थेंब पाणी देण्याची सोय असते. उन्हाळ्याच्या दिवसात फळझाडांसाठी याचा वापर केल्यास उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होईलच, शिवाय कमी पाण्यात मोठी जमीन ओलिताखाली आणता येईल.
advertisement
खर्च कमी अन् उत्पन्न जास्त, तरूण शेतकरी करतोय फायद्याची शेती, कमाई लाखात!
गरम झळांपासून बागेचा बचाव व्हावा म्हणून बागेच्या सभोवार निलगिरी, मलबेरी, शेवरी, शिकेकाई, सुबाभूळ, प्रोसोफीस, नीम, चिंच, शेवगा, पांगारा या वारा प्रतिबंध झाडांची रांग वा पट्टा लावणे फायद्याचे ठरते. उन्हाळ्यामध्ये फळबागांमध्ये सूक्ष्म सिंचन पद्धती, आच्छादन, बाष्परोधकांचा वापर करणे आवश्यक आहे. जेणेकरून वाढत्या तापमानाचा विपरित परिणाम फळझाडांवर होणार नाही.
कडक उन्हापासून नवीन लागवड केलेल्या फळझाडांच्या रोपांचे संरक्षण करण्यासाठी पहिली 1 ते 2 वर्ष रोपांवर सावली करावी. त्यासाठी रोपाच्या दोन्ही बाजूंना 3 फूट लांबीचे बांबू रोवावेत. या बाबूंना चारही बाजूंनी व मधून तिरकस असे बांबू किंवा कामट्या बांधून त्यावर वाळलेले गवत अंथरावे. या गवतावरून तिरकस काड्या सुतळीने व्यवस्थित बांध्याव्यात. वाळलेल्या गवता ऐवजी बारदाना किंवा शेडनेटचा वापर करावा.