जालना : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ढगाळ हवामान तसेच वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी ढगाळ हवामानामध्ये आपल्या द्राक्ष बागांची काळजी कशा पद्धतीने घ्यावी? याबाबत जालना येथील कृषी विज्ञान केंद्र खरपुडीचे शास्त्रज्ञ प्राध्यापक सुनील कळंब यांनी माहिती सांगितली आहे.
advertisement
हवामान विभागाने सांगितलेल्या माहितीप्रमाणे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान आणि वादळी पावसाची शक्यता आहे. ढगाळ हवामानामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या द्राक्ष बागांची विशेष काळजी घ्यावी लागते. वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे आणि खतांची मात्रा देऊन दूषित हवामानापासून द्राक्ष बागांचे संरक्षण करणे गरजेचे असतं.
पारंपरिक शेतीला दिला फाटा, मित्राचा ऐकला सल्ला अन् केली कांद्याची लागवड, शेतकरी झाला मालामाल
ढगाळ हवामानामध्ये द्राक्ष बागायतदारांनी द्राक्ष बागेवर सल्फर युक्त बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे. त्याचबरोबर प्रति दहा लिटर पाण्यात 15 ग्रॅम मॅग्नेशियमची फवारणी आपल्या द्राक्ष बागेवर घ्यायची आहे. त्याचबरोबर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाच किलो कॅल्शियम थायसल्फेट द्राक्ष बागांना द्यायचा आहे. यानंतर चार ते पाच तासांनी मॅग्नेशियम सल्फेट एकरी सात किलो याप्रमाणे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून द्राक्ष बागांना द्यायचा आहे. यामुळे द्राक्ष बागेतील झाडांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहून झाडांची वाढ, फळांची वाढ योग्य प्रमाणात होईल. द्राक्ष बाग कीड रोगांना बळी पडणार नाही, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना येथील शास्त्रज्ञ सुनील कळंब यांनी दिली.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील वाघरुळ, नावा, वाघरुळ, नंदापूर, पीर कल्याण ही गावे द्राक्ष बागांची हब समजली जातात. इथे प्रत्येक शेतकऱ्याकडे थोड्याफार प्रमाणात का होईना द्राक्षबाग असल्याचे पाहायला मिळते. द्राक्षांना मिळत असलेला कमी दर आणि वातावरणात होत असलेले सातत्याने बदल यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा कमी केल्या असल्या तरी अजूनही या परिसरात द्राक्षाचे मोठे उत्पादन घेतले जातं.





