आवश्यक कागदपत्रे कोणती?
हरभरा हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडे आधारकार्ड, ई-पीक पाहणीसह सातबारा उतारा, आधार लिंक असलेले बँक पासबुक आणि सक्रिय मोबाईल क्रमांक असणे बंधनकारक आहे. शासनाने नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.
नोंदणी कशी करायची?
शेतकरी अधिकृत पोर्टलवरून किंवा ‘eSamriddhi’ (ई-समृद्धी) मोबाईल अॅपच्या माध्यमातून घरबसल्या नोंदणी करू शकतात. तसेच, सध्या सुरू असलेल्या तूर हमीभाव खरेदी केंद्रांवर प्रत्यक्ष जाऊनही नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून ही दुहेरी व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
‘eSamriddhi’ अॅपद्वारे नोंदणी करताना सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून अॅप डाउनलोड करावे. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकून OTP द्वारे पडताळणी करावी. पुढील टप्प्यात वैयक्तिक माहिती नाव, पत्ता, जिल्हा, तालुका आणि गाव भरावी. त्यानंतर पिकांच्या तपशीलात हरभरा पिकाची निवड करून सातबाऱ्यावरील गट क्रमांक व पेरणी केलेले क्षेत्र (हेक्टर/एकरमध्ये) नमूद करावे.
यानंतर आवश्यक कागदपत्रे आधारकार्ड, सातबारा उतारा आणि बँक पासबुक अपलोड करून सर्व माहितीची खात्री करावी. सबमिट केल्यानंतर नोंदणी पूर्ण होत असून शेतकऱ्यांना एक टोकन क्रमांक दिला जातो. हा टोकन क्रमांक खरेदी प्रक्रियेदरम्यान आवश्यक ठरणार आहे.
शासनाच्या सूचनेनुसार, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची माहिती पडताळल्यानंतरच त्यांना हमीभावाने विक्रीची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
