१५ मार्चपासून सुरू होते निर्यात हंगाम
कोकणातून दरवर्षी १५ ते २० मार्चदरम्यान आंबा निर्यातीला सुरुवात होते. विशेषतः Alphonso mango अर्थात हापूस आंब्याची जगभरात मोठी मागणी आहे. भारतातून होणाऱ्या एकूण आंबा निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा सुमारे ६० ते ७० टक्के आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांचे मोठे योगदान आहे.
advertisement
या तीन जिल्ह्यांतून दरवर्षी सुमारे १ लाख ७० हजार मेट्रिक टन हापूस आंब्याचे उत्पादन होते. त्यापैकी अंदाजे २० ते २५ हजार मेट्रिक टन आंबा थेट परदेशात निर्यात केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिस्थितीचा या उत्पादनावर मोठा परिणाम होतो.
आखाती देश मोठी बाजारपेठ
कोकणातील हापूस आंब्यासाठी यूएई ही सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. याशिवाय अमेरिका, जपान, साऊथ कोरिया तसेच अनेक युरोपीय देशांत कोकणातील आंबा निर्यात केला जातो. या सर्व बाजारपेठांमध्ये हापूस आंब्याला मोठी मागणी असते. मात्र आखाती प्रदेशातील युद्ध परिस्थितीमुळे लॉजिस्टिक्स, विमान वाहतूक आणि व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
यंदा उत्पादनात मोठी घट
यंदा हवामानातील बदलाचाही आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ यांच्या संयुक्त पाहणीतून धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. आंब्याच्या बागांमध्ये नर मोहोरांचे प्रमाण वाढणे आणि मोहोर करपणे यामुळे यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात सुमारे ८० टक्क्यांची घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रक्रिया उद्योगावरही परिणाम
ताज्या आंब्याबरोबरच कोकणातून मोठ्या प्रमाणात मँगो पल्प किंवा आमरसाचीही निर्यात केली जाते. कोकणातील एकूण हापूस उत्पादनापैकी सुमारे २५ ते ३० टक्के आंबा प्रक्रिया उद्योगाकडे जातो. यातील सुमारे ८५ टक्के मँगो पल्प युरोपीय देशांत निर्यात केला जातो. त्यामुळे युद्ध परिस्थिती दीर्घकाळ टिकल्यास ताज्या आंब्याबरोबरच प्रक्रिया उद्योगालाही फटका बसू शकतो.
निर्यातीमुळे मिळते मोठे परकीय चलन
केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या Agricultural and Processed Food Products Export Development Authority च्या अहवालानुसार २०२४–२५ हंगामात भारतातून सुमारे ३५ हजार मेट्रिक टन ताजा आंबा निर्यात करण्यात आला. या निर्यातीचे एकूण मूल्य जवळपास ६०० कोटी रुपये होते. या निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे.
हापूसला जीआय टॅगचा फायदा
कोकणातील हापूस आंबा हा जगातील सर्वात महागड्या आणि दर्जेदार आंब्यांपैकी एक मानला जातो. या आंब्याला भौगोलिक मानांकन अर्थात GI टॅग मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची विश्वासार्हता वाढली आहे. त्यामुळे इतर आंबा वाणांच्या तुलनेत हापूस आंब्याला अधिक दर मिळतो.
