मुंबई : मोठी स्वप्नं पाहण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज असतेच, असं नाही. जिद्द, मेहनत आणि स्पष्ट ध्येय असेल, तर छोट्याशा खोलीतूनही मोठा व्यवसाय उभा राहू शकतो, हे एका तरुण उद्योजकाने सिद्ध करून दाखवले आहे. केवळ एक लाख रुपयांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज देशभरात ओळख निर्माण करणारा ठरला आहे.
advertisement
छोट्या खोलीपासून केली सुरुवात
मित्रेश शर्मा असं या तरुणाचे नाव असून ते झारखंड मधील जमशेदपूर येथील रहिवाशी आहेत. 2017 साली यांनी त्यांच्या आई सरोज देवी शर्मा यांच्यासोबत मिळून फर्स्ट बड ऑरगॅनिक्स या सेंद्रिय उत्पादनांच्या कंपनीची सुरुवात केली. सुरुवातीला घरातील एका छोट्या खोलीतून हा उद्योग उभा राहिला. लोकांपर्यंत शुद्ध, रसायनमुक्त आणि थेट शेतातून आलेले अन्न पोहोचवणे, हे त्यामागचे मुख्य उद्दिष्ट होते. आज हेच स्वप्न प्रत्यक्षात उतरले असून फर्स्ट बड ऑरगॅनिक्सची उत्पादने देशातील 500 हून अधिक पिनकोडमध्ये उपलब्ध आहेत.
मित्रेश शर्मा यांचा व्यवसाय मॉडेल अगदी साधा पण प्रभावी आहे. ते शेतकऱ्यांकडून थेट सेंद्रिय चहा, हळद, मध, मसाले आणि इतर उत्पादने खरेदी करतात आणि कोणतेही रासायनिक प्रक्रिया न करता ती ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळतो आणि ग्राहकांना खात्रीशीर शुद्ध अन्न मिळते. मित्रेश यांचा ठाम विश्वास आहे की त्यांची कंपनी केवळ नफा कमावण्यासाठी नसून, ही एक चळवळ आहे जी शेतकरी, ग्राहक आणि निसर्ग यांना एकत्र जोडते.
शार्क टँकपर्यंत पोहोचले
फर्स्ट बड ऑरगॅनिक्स या ब्रँडला अधिक ओळख मिळाली ती ‘शार्क टँक इंडिया’च्या तिसऱ्या आणि चौथ्या सीझनमधील सहभागामुळे. या मंचावर मित्रेश यांनी आत्मविश्वासाने आपली संकल्पना मांडली आणि गुंतवणूकदारांसह प्रेक्षकांनाही प्रभावित केले. त्यानंतर त्यांच्या ब्रँडला मोठी प्रसिद्धी मिळाली.
शिक्षण पूर्ण करून घेतला शेती करण्याच्या निर्णय
शिक्षणाबाबत बोलायचं झालं, तर मित्रेश शर्मा यांनी नवी दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (NDIM) येथून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आहे. तसेच जमशेदपूरमधील XLRI संस्थेतून उद्योजकता व्यवस्थापनाचा विशेष अभ्यासक्रमही पूर्ण केला. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी गोल्डओशन कम्युनिकेशन्समध्ये नोकरी केली आणि नंतर व्हायरल वेव्हज नावाचे डिजिटल मार्केटिंग स्टार्टअपही सुरू केले.
दुबई युरोपपर्यंत भरारी
आज फर्स्ट बड ऑरगॅनिक्स केवळ भारतातच नव्हे, तर दुबई आणि युरोपमध्ये निर्यात करण्याच्या तयारीत आहे. मित्रेश यांचे ध्येय भारतातील सेंद्रिय उत्पादन क्षेत्रात अग्रस्थानी पोहोचण्याचे आहे.
आरोग्याबाबत वाढलेल्या जागरूकतेमुळे सेंद्रिय उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. या गरजेची योग्य वेळेत ओळख करून मित्रेश शर्मा यांनी मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले आहे. छोट्या सुरुवातीपासून कोट्यवधींच्या व्यवसायापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
