घरातील एका खोलीतून सुरू झाला यशाचा प्रवास
येवला तालुक्यातील पिंपरी गावातील मुकुंद कुदळ हा मूळचा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. पारंपरिक नोकरी किंवा पारंपरिक शेती यापलीकडे जाऊन काहीतरी वेगळे करण्याची इच्छा त्याच्या मनात होती. दुष्काळी परिस्थिती, कमी पाणी आणि शेतीतून मिळणारे मर्यादित उत्पन्न पाहता त्याने पर्यायी शेतीचा विचार सुरू केला. याच दरम्यान त्याला मशरूम शेतीबाबत माहिती मिळाली आणि त्याने या क्षेत्रात प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
मुकुंदने सुरुवातीला कोणतीही मोठी गुंतवणूक न करता युट्यूब आणि ऑनलाइन माध्यमांतून मशरूम शेतीचे प्रशिक्षण घेतले. तापमान, आर्द्रता, स्वच्छता, कच्चा माल आणि देखभाल याबाबत सखोल माहिती घेतल्यानंतर त्याने प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात केली. आपल्या घरातील अवघ्या १० बाय १० फूटाच्या एका खोलीत त्याने मशरूम उत्पादनासाठी आवश्यक व्यवस्था उभी केली. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकल्पासाठी त्याला दहा हजार रुपयांपेक्षाही कमी खर्च आला.
अवघ्या तीन महिन्यांत उत्पादन आणि उत्पन्न सुरू
मशरूम शेतीची सुरुवात केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच उत्पादन मिळू लागले. पहिल्याच टप्प्यात मशरूमची गुणवत्ता चांगली असल्याने त्याला बाजारातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. घरच्या घरी सुरू झालेल्या या शेतीतून नियमित उत्पन्न मिळू लागल्याने मुकुंदचा आत्मविश्वास आणखी वाढला. पारंपरिक शेतीत जिथे उत्पन्नासाठी महिने-महिने वाट पाहावी लागते, तिथे मशरूम शेतीत कमी कालावधीत परतावा मिळत असल्याचे त्याचे अनुभव सांगतात.
नाशिक आणि मुंबई बाजारपेठेत वाढती मागणी
सध्या मुकुंदकडून उत्पादित होणारे मशरूम येवला परिसरातील स्थानिक बाजारात विकले जात आहेत. त्याचबरोबर नाशिक आणि मुंबई येथील व्यापाऱ्यांकडूनही मागणी वाढताना दिसत आहे. ताजे, स्वच्छ आणि दर्जेदार मशरूम असल्यामुळे ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्याला स्थिर आणि विश्वासार्ह उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे.
पुढील टप्प्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचा मानस
भविष्यात घरातील खोलीपुरते मर्यादित न राहता शेडनेट उभारून मोठ्या प्रमाणावर मशरूम शेती करण्याचा मुकुंदचा मानस आहे. एक्स्पोर्ट क्वालिटीचे मशरूम उत्पादन करून बाह्य बाजारपेठेत प्रवेश करण्याचे त्याचे स्वप्न आहे. इंजिनिअर असूनही शेतीत नवे प्रयोग करणारा मुकुंद आज ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. कमी भांडवल, योग्य नियोजन आणि आधुनिक माहितीच्या जोरावर शेतीतही उज्ज्वल भविष्य घडू शकते, हे त्याने आपल्या यशातून दाखवून दिले आहे.
