हप्ता कधी मिळणार?
मागील २०व्या हप्त्यात देशभरातील ९.७ कोटी शेतकऱ्यांना तब्बल २० हजार ५०० कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. तथापि, या वेळेस ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच २१वा हप्ता मिळणार आहे. केंद्र सरकारने इतर राज्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा होणार असल्याचे संकेत दिले आहेत, मात्र अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
advertisement
ई-केवायसी अनिवार्य
पीएम-किसान योजनेनुसार प्रत्येक लाभार्थ्याने ई-केवायसी आणि बँक खाते पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. शासनाच्या नियमानुसार, हप्ते साधारणतः ४ ते ६ महिन्यांच्या अंतराने दिले जातात. मागील वर्षी १८वा हप्ता ५ ऑक्टोबर २०२४ रोजी, तर १९वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी वितरित झाला होता. याच पद्धतीनुसार २१वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित होता, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तो थोडा उशिरा दिला जात आहे.
केंद्र सरकारच्या संकेतस्थळावरून शेतकरी आपला हप्ता स्टेटस तपासू शकतात. यासाठी पीएम-किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकावा लागतो.
काही राज्यांचा हप्ता जमा
पूरग्रस्त प्रदेशांसाठी केंद्र सरकारने तत्काळ पाऊल उचलत २१व्या हप्त्याचे वितरण सुरू केले आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले आहेत, तर जम्मू-काश्मीरसाठी ७ ऑक्टोबर रोजी हा हप्ता जारी झाला. पूर आणि भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून ही रक्कम महत्त्वाची ठरत आहे. शासनाच्या मते, उरलेल्या राज्यांतील शेतकऱ्यांना जानेवारी २०२६च्या अखेरपर्यंत पैसे मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून लवकरच अधिकृत तारीख जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
तसेच शासनाच्या माहितीनुसार, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पैसे मिळतील, तर बाकी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
