शेतकऱ्यांना मिळणार २ हजार रुपयांचा हप्ता
पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी २ हजार रुपयांच्या स्वरूपात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
याच योजनेचा २२ वा हप्ता १३ मार्च रोजी वितरित होणार असून देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपयांची रक्कम थेट जमा होणार आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक खर्च भागवण्यास मदत होणार आहे.
advertisement
होळीपूर्वी हप्ता येण्याची चर्चा
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये या हप्त्याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. काहीजणांनी होळीच्या सणापूर्वी हा हप्ता जमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र तसे झाले नाही.
दरम्यान आता कृषी विभागाने अधिकृत माहिती देत होळीनंतर हा हप्ता वितरित केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. कृषी विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत माहिती शेअर करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते वितरण
१३ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर असणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम-किसान योजनेचा २२ वा हप्ता वितरित केला जाणार आहे.
या दिवशी डिजिटल पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी वर्ग केला जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
लाभार्थी यादीत नाव कसे तपासावे?
शेतकरी आगामी हप्त्यासाठी पात्र आहेत की नाही हे तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन लाभार्थी यादी तपासू शकतात. यासाठी खालील प्रक्रिया वापरता येते.
पीएम-किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
‘Beneficiary List’ किंवा लाभार्थी यादी या विभागावर क्लिक करा.
त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका (उपजिल्हा), ब्लॉक आणि गाव निवडा.
‘Submit’ बटणावर क्लिक केल्यानंतर संबंधित गावातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल. या यादीत नाव असल्यास संबंधित शेतकऱ्याला पुढील हप्त्याचा लाभ मिळू शकतो.
ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक
सरकारने पीएम-किसान योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासा
पीएम-किसान योजना ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाची आर्थिक मदत योजना मानली जाते. या योजनेमुळे छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात काही प्रमाणात आर्थिक आधार मिळतो.
