सांगली: सांगलीच्या घाटमाथ्यावरील खानापूर तालुक्यातील तरुण शेतीकडे वळत आहेत. यापैकीच रणजीत जाधव यांनी पडीक 24 गुंठे शेत जमिनीत भोपळा पिकाचा प्रयोग केला आहे. शक्यतो एकच तोडा करणाऱ्या भोपळ्याच्या पिकात त्यांनी तीन तोडे केले आहेत. 24 गुंठ्यात 13 टन भोपळा पिकवून त्यांनी तीन महिन्यात 1 लाखाचा नफा मिळवला आहे. भोपळ्याचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी त्यांनी नेमके कसे व्यवस्थापन केले त्यांच्याकडूनच जाणून घेऊया.
advertisement
तरुण शेतकरी रणजीत जाधव यांच्याकडे सुलतानगादे गावामध्ये शेत जमीन आहे. जाधव यांची 24 गुंठे शेती ओढ्याच्या काठावर असल्याने सततच्या ओलीने त्या शेतात कोणतेच पीक वटत नव्हते. पडीक जमिनीत एक प्रयोग करावा म्हणून त्यांनी भोपळा पिकाची माहिती घेतली. 24 गुंठे भोपळा पिकवण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. रणजीत यांनी भोपळ्याचे पीक घेण्यासाठी शेताची मशागत करून घेतली. पाच फूट अंतरावरील बेड तयार करून घेतले. यानंतर ठिबक अंथरून अडीच फुटांवरती दिशा कंपनीच्या भोपळ्याच्या बियांची ठोकनी केली. थ्रिप्स, करपा आणि दावण्या या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्यवस्थापन केले. आवश्यक पाणी आणि औषषध फवारणीने पिकाची काळजी घेतली.
सांगलीच्या शेतकऱ्याची कमाल, एकरी घेतलं तब्बल 13 टन दोडका उत्पादन, कमावला 3 लाखांचा नफा
तीन तोड्यांचा पहिलाच प्रयोग
शेतकरी भोपळा पिकाची एक तोडणी घेऊन काढणी करतात. परंतु प्रयोगशील शेतकरी रणजीत जाधव यांनी भोपळ्याचे तीन तोडे घेतले. टोकणीनंतर 75 व्या दिवशी भोपळ्याचा पहिला तोडा घेतला. पहिल्या तोडानंतर 35 व्या दिवशी दुसरा तोडा आणि दुसऱ्या तोडानंतर पुन्हा 35 व्या दिवशी तिसरा तोडा घेतला. पहिल्या तोड्यामध्ये आठ टन भोपळा तर दुसऱ्या आणि तिसऱ्या तोड्यामध्ये सुमारे पाच टन उत्पादन निघाले.
बारा महिने चालणारे पिक
भोपळा ही वेलवर्गीय वनस्पती बारा महिने उत्पादन देऊ शकते. कमी खर्चातही भोपळ्याचे चांगले उत्पादन घेता येत असल्याचे रणजीत जाधव यांनी प्रयोगातून सिद्ध केले आहे.
सांगलीच्या शेतकऱ्याची कमाल, एकरी घेतलं 152 टन उसाचे उत्पन्न, असे केले करेक्ट व्यवस्थापन
सततच्या वातावरण बदलाचा उत्पादनास फटका
सततच्या ढगाळ वातावरणाने आणि यंदाच्या अति पावसाने भोपळ्याला वेळच्यावेळी तण व्यवस्थापन करता आले नाही. यामुळे तण वाढून याचा उत्पादनास काही प्रमाणात फटका बसल्याचे रणजीत जाधव यांनी सांगितले. पडीक जमिनीत तीन ते पाच महिन्यात उत्पादन खर्चाच्या चारपट फायदा मिळाल्याने रणजीत यांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रथमच प्रयोग म्हणून त्यांनी भोपळ्याची शेती केली होती. यातून त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळाल्याने इथून पुढे काटेकोर व्यवस्थापनातून उत्पादनक्षमता वाढवणार असल्याचे त्यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.





