लष्करातून शेताकडे वळलेले पाऊल
लष्करातून निवृत्तीनंतर संतोष जाधव यांनी पुणे-मुंबईसारख्या शहरांत स्थायिक होण्याऐवजी आपल्या खानापूरमधील वडिलोपार्जित पाच एकर शेती पुन्हा उभी करण्याचा निर्णय घेतला. मागील दोन वर्षांपासून ते ऊस आणि हळदीचे पीक घेत आहेत.
20 गुंठ्यांत यशस्वी प्रयोग, 17 हजाराचा दर
यंदा फक्त 20 गुंठे क्षेत्रात 15 क्विंटल सेंद्रिय हळदीचे उत्पादन घेण्यात त्यांना यश आले. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी त्यांच्या हळदीला प्रतिक्विंटल 17,000 इतका उत्तम बाजारभाव मिळाला होता. संपूर्ण पीक घेताना सुमारे 1 लाख खर्च आला असूनही, उत्पन्न समाधानकारक ठरले आहे.
advertisement
हळदीपासून वर्षभर पुरवठा
संतोष जाधव हे त्यांच्या शेतीतून मिळणाऱ्या सेंद्रिय हळदीची पावडर तयार करून ती वर्षभर लोणावळ्यातील हॉटेलांना पुरवतात. त्यांच्या हळदीला असलेली खास चव, सुगंध आणि आयुर्वेदिक गुणधर्मामुळे ती अनेक प्रतिष्ठित हॉटेल्समध्ये आवर्जून मागवली जाते. त्यामुळे स्थानिक पातळीवरच नव्हे तर व्यापारी स्तरावरही त्यांची मागणी वाढली आहे.
हळदीसाठी वाढती बाजारपेठ
आजच्या काळात सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे हळदीला देखील सेंद्रिय स्वरूपात मोठी मागणी आहे.स्वयंपाकापासून आयुर्वेदिक औषधांपर्यंत हळदीचा उपयोग होत असल्यामुळे तिची किंमत आणि मागणी सातत्याने वाढते आहे.
उत्पन्न अधिक, खर्च कमी शेतीचा आदर्श
मार्च महिन्यापासून लागवड सुरू होत असलेल्या हळदीचे उत्पादन देशातील अनेक भागांत घेतले जात आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी ही शेती आता शेतकऱ्यांना नवे पर्याय देत आहे.
जाधवांच्या प्रयोगातून शेतकऱ्यांना प्रेरणा
संतोष जाधव यांच्या यशामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेट देत आहेत. त्यांच्या प्रयोगांची माहिती मिळवण्यासाठी प्रत्यक्ष संवाद, फोटो काढणे, निरीक्षण यासाठी शेतकऱ्यांचा ओघ सुरू आहे. त्यामुळे हे यश फक्त एका माजी सैनिकापुरते मर्यादित न राहता इतर शेतकऱ्यांसाठीही एक प्रेरणास्त्रोत ठरत आहे.