शेतकऱ्यांचा खुल्या बाजाराकडे वाढता ओढा
सोयाबीनच्या दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांचा कल हमीभाव खरेदी केंद्रांऐवजी थेट बाजार समितीकडे वाढताना दिसत आहे. खुल्या बाजारात अधिक दर मिळत असल्याने आणि व्यवहार रोखीने होत असल्यामुळे अनेक शेतकरी थेट विक्रीस प्राधान्य देत आहेत. काही शेतकऱ्यांनी आधीच हमीभाव खरेदी केंद्रांवर नोंदणी केली असली, तरी सध्या जास्त भावाच्या अपेक्षेने ते प्रत्यक्ष विक्री बाजार समितीतच करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तत्काळ पैसे येत असून, कर्जफेड आणि दैनंदिन खर्चासाठी मोठी मदत होत आहे.
advertisement
आधी कमी दर, आता वाढ – शेतकऱ्यांची नाराजी
मात्र या दरवाढीचा फायदा सर्व शेतकऱ्यांना समान प्रमाणात मिळालेला नाही. काढणीनंतर बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन साठा आधीच विक्री केला होता. त्या काळात त्यांना प्रतिक्विंटल ३,००० ते ३,२०० रुपये इतकाच दर मिळाला. यंदा पावसाळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन भिजल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. परिणामी, मिळालेला दर उत्पादन खर्चही भरून काढण्यास अपुरा ठरला. आता जवळपास ८० टक्के सोयाबीनची विक्री पूर्ण झाल्यानंतर दर वाढल्याने, या वाढीचा नेमका लाभ कोणाला मिळतोय, असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
व्यापाऱ्यांच्या साठवणुकीला सोन्याचे दिवस
दुसरीकडे, आधीच्या काळात कमी दरात सोयाबीन खरेदी करून साठवणूक केलेल्या व्यापाऱ्यांसाठी सध्याची दरवाढ फायदेशीर ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी स्वस्तात खरेदी केलेले सोयाबीन आता अधिक दराने विकता येत असल्याने व्यापाऱ्यांच्या नफ्यात वाढ झाली आहे. बाजारात मागणी वाढल्याने व्यवहारांचा वेगही वाढला असून, मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री सुरू आहे.
अडत बाजारात वाढलेली वर्दळ
दरवाढीचा थेट परिणाम लातूर बाजार समितीतील वातावरणावर दिसून येत आहे. अडत बाजारात गर्दी वाढली असून, हमीभाव खरेदी केंद्रांच्या तुलनेत खुल्या बाजारात व्यवहार अधिक होत आहेत. शेतकरी, व्यापारी आणि वाहतूकदार यांची चांगलीच लगबग दिसत आहे. आगामी काळात आवक स्थिर राहिली आणि मागणी टिकून राहिली, तर दरात फारशी घसरण होणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हमीभाव खरेदी केंद्रांकडे दुर्लक्ष
राज्य शासनाने सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून नोंदणी करून घेतली होती. सुरुवातीला खुल्या बाजारापेक्षा हमीभाव चांगला वाटत असल्याने अनेकांनी नोंदणीची किचकट प्रक्रिया पूर्ण केली. मात्र आता खुल्या बाजारातच अधिक दर मिळत असल्याने अनेक नोंदणीकृत शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. सध्या तरी शेतकऱ्यांचा कल स्पष्टपणे बाजार समितीकडे झुकलेला दिसत असून, सोयाबीनच्या दरवाढीमुळे लातूर मार्केट यार्डमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
