मुंबई : राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना शेतीविषयक सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाविस्तार’ नावाचे नवीन मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे. या अॅपला ‘शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र’ असे नाव देण्यात आले असून, शेतकरी बांधवांसाठी हे अॅप मोठा आधार ठरणार आहे.
advertisement
अॅपमधील सुविधा
या अॅपद्वारे शेतकऱ्यांना शेतीसंबंधित जवळपास सर्वच गोष्टींची माहिती मिळणार आहे. हवामान अंदाज, पिकांसाठी योग्य सल्ला, लागणाऱ्या खतांची अचूक मात्रा, कीड व रोगांवरील उपाययोजना, तसेच बाजारभाव यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. यामुळे शेतकरी योग्य वेळी निर्णय घेऊन उत्पादन व नफा वाढवू शकतील.
तसेच, या अॅपवरून गावाजवळील अवजारे बँकांची माहितीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर सहज मिळवता येणार आहे.
योजनांची माहिती एका ठिकाणी
राज्यात राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, महाडीबीटीवरील सर्व योजना आणि त्यासाठी आवश्यक अर्ज प्रक्रिया व कागदपत्रांची माहिती या अॅपमध्ये दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेणे सोपे होईल.
याशिवाय, ऑनलाइन ‘शेती शाळा’ या विभागात शेतीत वापरल्या जाणाऱ्या नव्या तंत्रज्ञानावरील व्हिडिओ पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी घरबसल्या नवीन शेती तंत्रज्ञान आत्मसात करू शकतील.
शंका निरसन व सल्ला
या अॅपमध्ये ‘मला प्रश्न विचारा’ हा खास विभाग उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतकरी आपल्या शंका व प्रश्न थेट येथे विचारू शकतात आणि कृषी तज्ज्ञ त्यांचे निराकरण करतील. यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर आणि अचूक माहिती मिळणार आहे.
अॅप कसे वापरावे?
शेतकरी बांधवांनी प्ले स्टोअरवरून ‘महाविस्तार’ अॅप डाउनलोड करावे.
नंतर आपल्या शेतकरी आयडीने लॉग-इन करून नाव, गाव आणि तालुका प्रविष्ट करावे.
यानंतर गावनिहाय व तालुकानिहाय सर्व माहिती शेतकऱ्यांना थेट उपलब्ध होईल.
कृषी अधिकाऱ्यांशी थेट संपर्क
या अॅपमुळे शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधणेही सोपे झाले आहे. गरज भासल्यास शेतकरी थेट अधिकाऱ्यांशी बोलून अधिक माहिती मिळवू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण वेगाने होईल.
डिजिटल मित्राची नवी वाटचाल
‘महाविस्तार’ अॅप हे शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान आणि माहिती यांचा संगम आहे. हवामानातील बदल, कीड-रोगांचा प्रादुर्भाव किंवा बाजारातील चढ-उतार यावर आता शेतकरी एका मोबाईल अॅपद्वारे सजग राहू शकतील. शासनाच्या या उपक्रमामुळे शेती अधिक शाश्वत, स्पर्धात्मक आणि फायद्याची होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.