संकल्प आणि प्रयत्नातून उभा राहिलेला व्यवसाय
कल्पनाताईंनी आपल्या पती दीपक यांच्याशी व्यवसाय विस्ताराविषयी चर्चा केली आणि त्यांचा संपूर्ण पाठिंबा मिळवला. त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती केवळ दोन एकर शेती आणि दहा बाय दहा फुटांचे घर हेच त्यांचे संपूर्ण भांडवल होते. त्यांनी लहानशा प्रमाणावर सुरू केलेल्या गोठ्यातून हळूहळू वाढ करत व्यवसायाचा विस्तार करण्याचे ठरवले.
advertisement
सुरुवातीला त्यांनी चार गायींची खरेदी केली आणि व्यवसाय वाढीस लावण्यासाठी २०१६ मध्ये कर्ज घेतले. या कर्जाच्या सहाय्याने 50 बाय 60 फूट आकाराचे आधुनिक मुक्तसंचार गोठे उभारण्यात आले, ज्यामुळे गायींना अधिक सोयीस्कर वातावरण मिळाले.
गुणवत्तापूर्ण गाईंच्या पैदाशीवर भर
नवीन गायी विकत घेण्याऐवजी, त्यांनी स्वतःच्या गोठ्यातील गाईंच्या सुधारित पैदाशीवर भर दिला. उच्च दूध उत्पादन देणाऱ्या आणि आजारांना कमी बळी पडणाऱ्या गायींचे संगोपन करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.आज त्यांच्याकडे 33 उच्च प्रतीच्या गायी आहेत, आणि त्यांचे दैनंदिन दूध संकलन 260 लिटरपर्यंत पोहोचले आहे. त्यांच्या व्यवसायाचे नाव "दीपक्लप डेअरी फार्म" असे आहे.
आधुनिक तंत्रज्ञान आणि नैसर्गिक पद्धतींचा समतोल
त्यांनी गाईंना संतुलित आहार मिळावा यासाठी ओला आणि सुका चारा यांचा योग्य समतोल राखला. तसेच,पूरक आहाराचा प्रभावी वापर करून गायींच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. गायी आजारी पडण्याचे प्रमाण कमी राहावे यासाठी नियमित लसीकरण आणि औषधोपचार केले जातात. जर किरकोळ आरोग्य समस्या निर्माण झाल्या, तर त्या आयुर्वेदिक उपायांद्वारे सोडवल्या जातात.
दुग्धव्यवसायासोबतच सेंद्रिय खतनिर्मितीचा समावेश
दुग्धव्यवसायाला पूरक असा सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पही त्यांनी सुरू केला आहे. दरमहा 3 ते 4 टन जैविक खत तयार होते, जे शेतकऱ्यांना विकले जाते. या प्रकल्पामुळे दुग्धव्यवसायासह अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोतही निर्माण झाला आहे.
व्यवस्थित व्यवस्थापनामुळे आर्थिक उन्नती
कल्पनाताई आपल्या व्यवसायाचे प्रत्येक तपशीलवार व्यवस्थापन करतात.गायींचे दूध उत्पादन,कृत्रिम रेतनाची नोंद,रोजचा खर्च आणि उत्पन्न यांची नोंद ठेवल्यामुळे त्यांना व्यवसाय नियोजन अधिक परिणामकारकपणे करता आले.
संपूर्ण कुटुंबाची उन्नती
त्यांच्या अथक परिश्रमांचे फळ त्यांच्या कुटुंबाच्या प्रगतीत स्पष्टपणे दिसून येते. मुलगा आंतरराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहे.मुलगी कृषी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असून, स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहे.शेती आणि दुग्ध व्यवसायाच्या उत्पन्नातून त्यांनी टुमदार नवीन घर उभारले आहे.
मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे यशाची वाटचाल
फलटण येथील गोविंद डेअरीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले,आणि त्यांनी त्या सल्ल्याचा योग्य उपयोग करून स्वतःचा व्यवसाय अधिक मजबूत केला.