गेल्या काही काळापासून जागतिक आयटी (IT) क्षेत्रात कपातीचे सत्र सुरूच आहे, पण ओरॅकलने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वात मोठा तडाखा भारतीय तरुण वर्गाला बसला आहे. एका बाजूला तंत्रज्ञानाची प्रगती होत असताना दुसरीकडे मानवी हातांना मिळणारं काम कमी होत आहे का? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.
नेमकं काय घडलं? सकाळी 6चा तो मेल
advertisement
ओरॅकलच्या व्यवस्थापनाकडून सकाळी 6 वाजता कर्मचाऱ्यांना एक अधिकृत मेल पाठवण्यात आला. या मेलमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की, कंपनी आपल्या रचनेत मोठे संघटनात्मक बदल करत आहे, त्यामुळे अनेक पदे रद्द करण्यात येत आहेत. हा मेल केवळ एक नोटीस नव्हती, तर अनेकांसाठी त्यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस ठरला.
जागतिक स्तरावर सुमारे 30 हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला असून, त्यापैकी तब्बल 12 हजार हे भारतीय कर्मचारी आहेत. भारत हा आयटी सेक्टरचा हब असल्यामुळे या कपातीचा सर्वाधिक परिणाम आपल्या देशातील गुणवंत तरुणांवर झाला आहे.
नोकऱ्या जाण्यामागचं व्हिलन नक्की कोण?
ओरॅकलने इतका मोठा निर्णय घेण्यामागे दोन मुख्य कारणं सांगितली जात आहेत.
1. खर्च कपात (Cost Cutting): जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता पाहता कंपनी आपला खर्च कमी करण्यासाठी आणि बिझनेस स्ट्रक्चर बदलण्यासाठी हे पाऊल उचलत आहे.
2. AI आणि ऑटोमेशनचा वाढता प्रभाव: हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आता 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) केवळ एक मदतीचं साधन राहिलेलं नाही, तर तो मानवी कामाची जागा घेऊ लागला आहे.
चॅटबॉट्स: पूर्वी ज्या कामासाठी कस्टमर सपोर्ट टीम असायची, तिथे आता चॅटबॉट्स अधिक वेगाने उत्तरं देत आहेत.
डेटा ॲनालिसिस: तासनतास लागणाऱ्या डेटा विश्लेषणाचे काम AI टूल्स काही मिनिटांत अचूकपणे करत आहेत.
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट: कोड लिहिण्यापासून ते टेस्टिंगपर्यंतची कामं आता AI द्वारे सोपी झाली आहेत, ज्यामुळे कंपन्यांना कमी कर्मचाऱ्यांत जास्त काम करणं शक्य होत आहे.
इतर कंपन्यांचीही हीच वाटचाल?
केवळ ओरॅकलच नाही, तर यापूर्वी गुगल, मेटा आणि ॲमेझॉन सारख्या बलाढ्य कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. पारंपारिक नोकऱ्या संपवून त्या जागी एआय आधारित यंत्रणा राबवण्याकडे या कंपन्यांचा कल वाढला आहे.
थोडक्यात काय तर, तंत्रज्ञानाचा वेग जितका वाढत आहे, तितकीच रोजगाराची समीकरणं बदलत आहेत. ओरॅकलमधील ही कपात केवळ एक आकडेवारी नाही, तर ती आयटी क्षेत्रातील बदलत्या पर्वाची नांदी आहे. अशा परिस्थितीत स्वतःला नवीन तंत्रज्ञानानुसार अपडेट करणं, हाच आता कर्मचाऱ्यांसमोरचा एकमेव पर्याय उरला आहे.
