भारतीय रेल्वेने ॲप्रेंटिसशिपसाठी सुमारे तीन हजार पदांवर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असून अर्ज प्रक्रिया 5 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार 4 सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतात. अधिक माहितीसाठी तसंच अर्ज करण्यासाठी wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलं आहे. पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर झोनकडून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. एकूण 3317 पदांसाठी ही प्रक्रिया पार पडेल. ही संपूर्ण अर्ज प्रक्रिया फक्त ऑनलाइन होणार असून टपालद्वारे पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत असंही रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
advertisement
3317 पैकी 1262 पदं जेबीपी डिव्हिजनमध्ये, 824 पदं बीपीएल डिव्हिजनमध्ये, 175 पदं सीआरडब्ल्यूएस बीपीएल डिव्हिजनमध्ये भरण्यात येणार आहेत. 196 पदं डब्ल्यूआरएस तर 28 पदं ही मुख्यालयात भरली जाणार आहेत. मेडिकल लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी आणि रेडिऑलॉजी) पदांसाठी सायन्स घेऊन 12 वी झालेले उमेदवार अर्ज करु शकतात. इतर पदांसाठी 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातील आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि वयोमर्यादा 15 ते 24 अशी ठरवण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. सर्वांसाठी 141 रुपये अर्ज शुल्क असून एससी, एसटी आणि दिव्यांगांसाठी ते 41 रुपये एवढं आहे. निवड मेरिटवर होणार असून, मेरिट हे शैक्षणिक पात्रतेवर ठरवलं जाईल असंही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.