आई-बापाचं काबाड कष्टाचं फळ मिळालं
भिकनचे वडील जगन आणि आई बेबीबाई यांनी या यशासाठी किती सोसलंय, हे फक्त त्यांनाच ठाऊक. सुरुवातीला पोट भरण्यासाठी ते वाडा (चाळीसगाव) भागात सालगडी म्हणून राबले. नंतर मूळगाव जळगाव सपकाळ येथे येऊन आपल्या दोन एकर कोरडवाहू शेतीत घाम गाळला. आई तर दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जायची. घरात खाणारी तोंडं जास्त आणि कमवणारे कमी, त्यात आईचा अपघात झाला, पण बापानं पोराच्या शिक्षणाची हौस कधीच कमी पडू दिली नाही. आज त्याच कष्टाचं खऱ्या अर्थानं सोनं झालंय.
advertisement
शिक्षणाचा खडतर प्रवास...
भिकनचा हा प्रवास काही सोपा नव्हता. त्याचं प्राथमिक शिक्षण वाडा ता. चाळीसगाव येथे झालं, तर माध्यमिक शिक्षण जळगाव सपकाळच्या विनय विद्यालयात. पुढे पदवीसाठी तो छत्रपती संभाजीनगरच्या विवेकानंद महाविद्यालयात आला. इथूनच त्याच्या डोक्यात साहेब होण्याचं खूळ शिरलं. दिल्लीत जाऊन अभ्यास करताना कधी खिशात दमडी असायची तर कधी नसायची, पण डोळ्यासमोर फक्त आई-बापाचे कष्ट होते.
शेवटी आनंदाचा दिवस उजाडला
6 मार्चला जेव्हा निकाल जाहीर झाला, तेव्हा जळगाव सपकाळ गावात जणू साखर वाटली गेली. 7 मार्चला तर अख्ख्या गावानं भिकनची अशी काही जंगी मिरवणूक काढली की भोकरदन तालुका बघतच राहिला. गावातल्या पोरांनी भंडारा आणि गुलाल उधळून जणू दिवाळीच साजरी केली. भिकनचा लहान भाऊ विकास आधीच आर्मीमध्ये भरती होऊन देशाची सेवा करतोय, आता मोठा भाऊ देखील अधिकारी झाला.
तरुणांना सल्ला काय?
अभ्यासात सातत्य असणे आवश्यक आहे. अपयशाने खचून न जाता संघर्ष करण्याची तयारी ठेवावी तेव्हाच यश नक्की मिळते, तसेच यूपीएससी असो किंवा इतर परीक्षांच्या तयारी करण्याच्या काळात आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव होणं आणि त्यांचा चेहरा आठवून अभ्यास करावा, आपल्या आई वडिलांच्या आताचे काम बंद व्हावे म्हणून अभ्यास करा यश नक्कीच मिळेल, असे रोजेकर याने म्हटले आहे.





