दोनदा अपयश पण हार नाही, जिद्दीला पेटलेला प्रणव अधिकारी झालाच, UPSC परीक्षेत मिळवली ही रँक
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
जिद्द आणि चिकाटी असेल तर यश मिळतेच, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कल्याण येथील प्रणव प्रशांत बेंडारी. दोन वेळा अपयशाचा सामना करूनही हार न मानता प्रणवने तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून त्याला देशात 926 वा क्रमांक मिळाला आहे.
advertisement
advertisement
प्रणव प्रशांत बेंडारी हा मूळचा कल्याण येथे राहणारा आहे. बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच त्याने यूपीएससी परीक्षा देण्याचे ध्येय निश्चित केले होते. त्या वेळेपासूनच त्याने या परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. सुरुवातीला शिक्षणासोबत थोडा वेळ काढून तो अभ्यास करत होता. त्याच्या मनात सुरुवातीपासूनच प्रशासन सेवेत जाऊन समाजासाठी काम करण्याची इच्छा होती.
advertisement
advertisement
कोविडच्या काळात कॉलेजचे शिक्षण ऑनलाईन झाल्यामुळे प्रणवला अभ्यासासाठी अधिक वेळ मिळाला. या काळात त्याने अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. तो दररोज सुमारे आठ तास अभ्यास करत असे, तर परीक्षा जवळ येत असताना हा अभ्यास 12 ते 14 तासांपर्यंत वाढत असे. मात्र या प्रवासात त्याला अपयशाचाही सामना करावा लागला. यापूर्वी त्याने दोन वेळा यूपीएससी परीक्षा दिली होती, परंतु दोन्ही वेळा तो प्रिलिम्समध्ये थोडक्यात अपयशी ठरला. दुसऱ्या प्रयत्नात तर तो केवळ एका गुणाने पुढे जाऊ शकला नव्हता. त्या वेळी त्याला मोठी खंत वाटली आणि काही काळ निराशाही आली होती. मात्र त्या अनुभवातून धडा घेत त्याने पुन्हा नव्या जिद्दीने तयारी सुरू ठेवली.
advertisement
advertisement
प्रणवची आई गृहिणी आहे, तर त्याचे वडील महानगरपालिकेच्या शॉप लायसन्स विभागात वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबाकडून मिळालेला पाठिंबा आणि प्रोत्साहन यामुळेच हा प्रवास शक्य झाल्याचे प्रणव सांगतो. पुढील काळात प्रशासन सेवेतून समाजासाठी काम करणे, लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे आणि लोकसेवेच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवून आणणे हेच आपले ध्येय असल्याचे प्रणवने सांगितले.






