दिलीप चव्हाण आणि संदीप चाफले असं टोळक्यानं हल्ला केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव आहे. घटनेच्या दिवशी ७ मार्चला रात्री दोघंही चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या आणि बदनाम गल्ली म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या पठाणपुरा भागातील पींक पॅराडाईज बारमध्ये बसले होते. हा परिसर विविध अवैध कृत्यांसाठी बदनाम आहे. दोघे बारमध्ये बसले असताना त्यांचा बारमध्ये एका युवकाशी वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संबंधित तरुण आणि दोन पोलीस कर्मचारी यांच्या बाचाबाची आणि मारहाण झाली.
advertisement
हा राग अनावर झाल्यानंतर संबंधित तरुण आपल्या आणखी काही साथीदारांना घेऊन बारमध्ये आला आणि त्याने टोळक्याच्या मदतीने दोन्ही पोलिसांना बेदम मारहाण केली. तसेच चाकुने वार करत दोन्ही पोलिसांना रक्तबंबाळ केलं. या हल्ल्यात दिलीप चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. तर संदीप चाफले हे गंभीर जखमी झाले. चाफले यांच्यावर खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
हा वाद नेमका कोणत्या कारणातून झाला? याची अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र बारमध्ये मद्य सेवन करत असताना झालेल्या किरकोळ वादातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी चंद्रपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अशाप्रकारे बारमध्ये दोन पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.