मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी येथील रहिवासी असणारी शाळकरी मुलगी रिक्षाने शाळेत जात होती. यावेळी रिक्षाचालक आणि त्याच्या एका साथीदाराने मुलीचं अपहरण केलं. विद्यार्थिनीला तिच्या शाळेजवळ न थांबवता रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने रिक्षा पळवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच या पीडित मुलीने प्रसंगावधान दाखवत दप्तरातील कंपास पेटीतून करकटक काढले आणि बाजूला बसलेल्या अपहरणकर्त्याला रिक्षातून ढकलून दिले. त्यानंतर रिक्षाचालकावर करकटकने हल्ला करत धावत्या रिक्षातून उडी मारली.
advertisement
तिने स्वत:चा जीव धोक्यात घालून स्वतःची सुटका करून घेतली. अपहरणाचा प्रयत्न होऊनही ती न डगमगता शाळेत गेली. सायंकाळी घरी गेल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला प्रसंग आपल्या आईवडिलांना सांगितली. मुलीसोबत घडलेला प्रकार समजताच पालकांनी तत्काळ भिवंडी पोलीस ठाणे गाठलं. त्यांनी दोन अज्ञात नराधमांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला, तसेच आरोपींना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवलं.
नेमकं काय घडलं?
ज्यावेळी रिक्षा शाळेजवळ आली, तेव्हा पीडित मुलीने 'काका रिक्षा थांबवा, माझी शाळा आली' असं सांगितलं. मात्र रिक्षाचालक आणि पीडितेसोबत मागील सीटवर बसलेला त्याचा साथीदार एकमेकांकडे नजरानजर करत हसू लागले. त्यांनी रिक्षा जलदगतीने शहराच्या बाहेर जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दिशेने पळवू लागले. आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय, याचा अंदाज येताच मुलीने प्रसंगावधान दाखवत कंपासपेटीतून करकटक काढलं आणि शेजारी बसलेल्या आरोपीला रिक्षातून ढकलून दिलं. तसेच रिक्षाचालकावर हल्ला करत स्वत: रिक्षातून उडी मारली.