गुब्बी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळीत सामील असलेल्या एका महिलेनं एक-दोन नव्हे, तर पाच जणांशी लग्न करून त्यांची फसवणूक केली. याबाबत पोलिसांकडे सातत्यानं तक्रारी येत होत्या. अखेर टोळीतल्या वधूसह तिच्या दोन साथीदारांना आणि लग्न जमवणाऱ्या दलालाला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. कर्नाटकबरोबरच महाराष्ट्रातही या टोळीनं काहीची फसवणूक केलीय.
2023मध्ये पोलिसांकडे आली होती तक्रार
advertisement
या प्रकरणी कृषी तज्ज्ञ पलक्षैया यांनी नोव्हेंबर 2023मध्ये गुब्बी पोलिसांकडे तक्रार केली होती. पलक्षैया यांचा मुलगा दयानंद याचं लग्न कोमल नावाच्या मुलीशी ऑक्टोबर 2023मध्ये झाले होते. पलक्षैया यांचा मित्र बसवराजू याने त्यांची लक्ष्मी नावाच्या महिलेशी ओळख करून दिली होती. ती मॅरेज एजंट असल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं. लग्न ठरल्यानंतर कोमल तिच्या साथीदारांसोबत पलक्षैया यांच्या घरी आली होती. त्या वेळी सिद्धप्पा आणि लक्ष्मी शंभूलिंगाही उपस्थित होते. या दोघांनी स्वतःला कोमलचे मामा आणि मामी असल्याचं सांगितलं होतं. त्या वेळी पलक्षैया यांनी लक्ष्मीला लग्न जमवण्याची रक्कम म्हणून अडीच लाख रुपये दिले.
तसंच कोमलला साडी आणि दागिने घेण्यासाठी पैसेही दिले. त्यानंतर कोमलला मंगळसूत्र आणि सोन्याचे कानातले दिले होते. लग्नानंतर तीन दिवसांनी कोमल हुबळीला माहेरी जात असल्याचं सांगून पलक्षैया यांच्या घरातून निघून गेली. त्यानंतर तिनं मोबाइल बंद करून ठेवला. पलक्षैया हे हुबळी येथे सिद्धप्पा यांच्या घरी गेले असता त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. अखेर त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती.
वाचा - बदलापूर घटनेची जखम ताजी असतानाच नायगावमध्ये पुनरावृत्ती; अवेरनेस कँपमध्ये उघड
पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून, संबंधित टोळीला पकडलं आहे. या टोळीनं आणखी चार जणांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रात मिरजमध्ये राहणाऱ्या तरुणाचादेखील समावेश आहे. या टोळीतले काही जण फरार असून, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
