चित्राताई पाटील असं हत्या झालेल्या माहिलेचं नाव आहे. तुळजापूरच्या रहिवासी असणाऱ्या चित्राताई अचानक घरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा सगळीकडे शोध घेतला. पण त्या कुठेच आढळून आल्या नाहीत. यानंतर त्यांचा मृतदेह सोलापूर-लातूर बायपास रोडवर नळदुर्ग रोड ब्रिज जवळ सापडला. त्यांचा गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी खोलात जाऊन तपास केला असता ज्या मुलाला पोटच्या मुलासारखं घरात सांभाळलं, खायला प्यायला दिलं त्याच मुलानं ही हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे.
advertisement
याप्रकरणी चित्राताई पाटील यांचे पूत्र संग्राम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी ओम नितीन निकम याला अटक केली आहे. आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संग्राम पाटील व त्यांची आई चित्राताई एकत्र राहत होते. त्यांच्या आईच्या गळ्यात नेहमी दीड तोळ्याचे गंठण, पाटल्या असे 15 ते 16 तोळे सोने असायचे. त्या नेहमी हे सोनं वापरत होत्या. शेजारी राहणारा 21 वर्षीय ओम निकम हा नेहमी त्यांच्या घरी यायचा. त्याच्या लग्नाची आणि लग्न ठरल्याची बोलणी करायचा. 18 जुलै रोजी चित्रा ताई घरी नव्हत्या. त्यावेळी त्यांच्या मुलाने घरी आल्यावर पत्नीस विचारले की, आई कुठे आहे, तेव्हा त्या ओम निकम सोबत फोन आल्यावर कुठेतरी गेल्याचे सांगितले. त्या दिवशी रात्री उशिरा ओम निकम याला अनेक फोन केले. मात्र त्याने आई आपल्यासोबत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्या बेपत्ता असल्याची तक्रार केली, पोलिसांनी तपास केल्यावर चित्रा ताईचा मृतदेह सापडला आणि त्यांच्या अंगावर दागिने नव्हते.
चित्रा ताई यांनी ज्या ओमला स्वतःच्या मुला, लेकरासारखं सांभाळल, त्याच्या सुख दुःखात आईसारखा खंबीरपणे आधार दिला. त्याच मुलाने त्यांचा विश्वासघात केला. त्यांचा गळा दाबून खून केला आणि अंगावर असलेले सोन्याचे दागिने लुटले. घटनेने तुळजापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.