बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यात एका आईने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा जीव घेतला. त्यानंतर मुलीचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरुन फेकून दिला आणि थेट आपल्या प्रियकराकडे निघून गेली. पोलिसांनी तिला अटक केली आहे.
आई घरातून बाहेर जायला निघाल्यामुळे अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलीने आईला बिलगून रडायला सुरुवात केली. असं झाल्यावर कुठलीही आई काय करेल? कदाचित मुलीला जवळ घेऊन शांत करेल. तिला लवकर परत येण्याचं आश्वासन देईल. तिला शांत करुन घरातील इतर कुणाकडे सोपवेल आणि मग जाईल. पण या आईने मात्र क्रौर्याची परिसीमा गाठली. बाहेर जाताना मुलगी बिलगून रडायला लागली म्हणून तिने चक्क गळा कापून मुलीचा जीव घेतला आणि तिचा मृतदेह बॅगेत भरुन फेकून दिला. या आईचे विवाहबाह्य संबंध होते. मुलीचा जीव घेतल्यानंतर ती तडक आपल्या प्रियकराकडे निघून गेली. पोलिसांनी रविवारी रात्री अडीच वाजता तिला अटक केली.
advertisement
मिठनपुरा रामबाग भागातील एफएसआय गोदाम परिसरात ही घटना घडली. शनिवारी साडेतीन वर्षांच्या मिष्टी कुमारीचा मृतदेह तिच्या घराजवळ एका बॅगेत सापडला. शुक्रवारपासून तिची आई काजल कुमारी गायब होती. आपली पत्नी मुलीची हत्या करुन प्रियकराबरोबर पळून गेल्याचा आरोप मिष्टीच्या वडिलांनी केला होता.
पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर काजलला रामपुरहरी परिसरातील प्रियकराच्या घरातून अटक केली. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा मुलीमुळे प्रियकराला भेटता येत नसल्याचं कारण काजलने दिलं. मिष्टीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह बॅगेत भरुन घराच्या छपरावरुन तिने ती बॅग जवळच असलेल्या एका खड्ड्यात फेकल्याचं पोलिसांना सांगितलं.
काजल म्हणाली, ‘मी एकटी असेन तरच मला स्वीकारणार असल्याचं प्रियकराने मला सांगितलं होतं. माझी मुलगी मिष्टी मला एक मिनिटही एकटीला सोडत नसे,’ त्यामुळे रागाच्याभरात हे कृत्य केल्याची कबुली काजलने दिली. ‘मुलगी रात्री मला बिलगून झोपत असे, आता तिच्याशिवाय मला झोप येत नाही,’ असं म्हणत काजलने आपल्या कृत्याबाबत पश्चात्ताप व्यक्त केला आहे. या हत्येत काजलच्या प्रियकराचा सहभाग नसल्याचं दिसत
आहे, मात्र अधिक तपास सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.