"पब्लिसिटीसाठी धंदे नका करू!"
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने हिंदी भाषा शिकणं मुलांसाठी अनिवार्य केलं होतं, ज्याला शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेने जोरदार विरोध केला. संपूर्ण राज्यभरातून या निर्णयाला विरोध करण्यात आला. तीव्र रोषानंतर राज्य सरकारला शाळांबाबत घेतलेला त्रिसूत्री भाषा सक्तीचा नियम मागे घ्यावा लागला होता. राज्यात चालणाऱ्या भाषेच्या सक्तीबाबत तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, असं विचारलं असता अभिजीत बिचुकले यांनी नव्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
advertisement
या सर्व प्रकरणावर बिचुकले थेट म्हणाले, "कोणीही फक्त 'पब्लिसिटी'साठी काहीही करू नये!" त्यांनी तर लगेच भविष्यात महाराष्ट्राचा नेता कोण असेल, हेच सांगून टाकलं. "महाराष्ट्रासाठी उद्याचा नेता फक्त आणि फक्त अभिजीत बिचुकलेच आहे. सगळ्यांची वय, त्यांचे कारनामे, कटकारस्थानं बघा. आजपर्यंत दारू आणि मटणावर अनेकांच्या निवडणुका झाल्या... आधी काँग्रेस होती, मग भाजप आली आणि त्यानंतर अभिजीत बिचुकलेच असणार आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल, मी कोणासोबत जाणार नाही."
"छत्रपतींची गादी माझीच, कोणी गैरवापर करू देणार नाही!"
बिचुकलेंनी पुढे जाऊन अजून एक मोठा दावा केला. ते म्हणाले, "मी शिवरायांचा वैचारिक माणूस आहे, त्यामुळे राजगादीबरोबर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडेच यावं लागेल. आजपर्यंत तुम्ही राजगादीचा गैरवापर केला, छत्रपतींच्या नावाचा गैरवापर केला. आता त्यांचा खरा वारसदार आला आहे... अभिजीत बिचुकले!"
उदयनराजेंबद्दल बोलताना ते म्हणाले, "उदयनराजे शांत आणि सभ्य असतील, पण मी त्यांच्यापेक्षाही सभ्य आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर इथून पुढे मी कोणालाही करू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझी आहे!" एवढंच नाही, तर जिथे जिथे भाजपची सत्ता असेल, तिथे मराठी भाषा सक्तीची करावी, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. बिचुकलेंच्या या विधानांमुळे पुन्हा एकदा चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. त्यांच्या बोलण्याने सोशल मीडियावर नवीन वाद सुरू होईल का, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल!