बीकानेर-जैसलमेरमध्ये घडली भयानक घटना
विवेक ओबेरॉय 'मॅशेबल इंडिया'शी बोलताना 'रोड' या चित्रपटाच्या शूटिंगच्या दिवसांची आठवण सांगितली. विवेक म्हणाला, "मी राजस्थानमध्ये 'रोड' चित्रपटाचे शूटिंग करत होतो आणि आम्ही बीकानेरहून जैसलमेरला जात होतो. सुंदर रस्ते, पण रात्रीची वेळ होती. मी ड्रायव्हरला किमान १५ ते २० वेळा गाडी हळू चालवायला सांगितले. रात्र आहे, व्हिजिबिलिटी कमी आहे, सावकाश चालव, असे मी वारंवार सांगितले." विवेक त्या वेळी गाडीच्या पुढच्या सीटवर बसला होता.
advertisement
मात्र, विवेकने ड्रायव्हरच्या दुर्लक्षामुळे एक निर्णय घेतला, जो त्याच्यासाठी जीवनदान ठरला. तो पुढे म्हणाला, "मी कंटाळून माझी सीट थोडी मागे केली. आणि त्याच क्षणी, अचानक एक भयंकर अपघात झाला! रात्रीच्या अंधारात अचानक रस्त्यावर एक उंटाची गाडी आली, जी पूर्णपणे लोखंडी सळयांनी भरलेली होती. गाडी धडकताच त्या सळया गाडीची विंडशील्ड भेदून आरपार गेल्या!"
मरणाच्या दारातून परतला होता विवेक ओबेरॉय
विवेकने सांगितले की, "जर माझी सीट सरळ असती, तर ती सळी माझ्या थेट डोक्यात घुसली असती." या अपघातानंतर तो गाडीतून बाहेर आला. "मी थोडक्यात वाचलो, पण अक्षरशः मरणाच्या दारातून परत आल्यासारखे वाटले," असे त्याने सांगितले. या घटनेनंतर त्याने रात्रीचा प्रवास टाळला.
विवेकने आणखी एका ड्रायव्हरसोबतचा अनुभव सांगितला, जो खूपच गंमतीशीर पण गंभीर होता. दुसऱ्या एका ड्रायव्हरनेही वेगात गाडी चालवण्यास सुरुवात केली. तो ऐकत नाही हे पाहून विवेकने शक्कल लढवली. विवेकने सांगितले, "मी त्याला 'वॉशरूमला जायचे आहे' असे सांगितले आणि गाडीतून खाली उतरलो. याच बहाण्याने गाडीची चावी काढून घेतली आणि त्याला तिथेच सोडून निघून गेलो."
विवेक ओबेरॉय सध्या रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी यांच्यासोबत 'मस्ती 4' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
