ही अभिनेत्री आहे निमिषा नायर, जी 'भय' आणि 'अमर कॉलनी' यासारख्या सीरिज आणि फिल्ममध्ये दिसली. तिच्यासोबत मुंबईच्या हायवेवर जे घडलं ते तिने इन्स्टाग्राम पोस्टमधून सांगितलं आहे. तिने सांगितल्यानुसार हायवेवर तिची गाडी अडवण्यात आली आणि नको तोच प्रकार केला आहे.
advertisement
अभिनेत्रीने सांगितल्यानुसार ही घटना 17 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. अंधेरीतील तिच्या घरापासून नरिमन पॉईंटपर्यंत एका मैत्रिणीसोहत ती उबर कॅबने प्रवास करत होती. पहाटेचे 4.45 झाले होते. त्यांची कॅब बांद्र्यातील खेरवाडी पुलाजवळ पोहोचली. तेव्हा एक बाईक त्यांच्या कॅबसमोर आली आणि कार अडवून धरली. गाडीला ते पुढेच जाऊ देत नव्हते.
त्यांनी कॅब थांबवण्याचा प्रयत्न केला. कॅबचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि ड्रायव्हरला धमकावलं. ही परिस्थिती पाहून निमिषाने या घटनेचं शूटिंग करायला सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मात्र अभिनेत्रीने प्रसंगावधान दाखवत दुचाकीचा नंबर नोंदवून घेतला. व्हिडीओतून माहिती देत निमिषाने सोशल मीडियावर पोलिसांना टॅग करून मदतीची आणि कारवाईची मागणी केली.
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधला आणि आरोपींच्या नोंदणी क्रमांकांवरून त्यांची ओळख पटवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. खेरवाडी पोलिसांच्या माहितीनुसार, दादर येथील हे तरुण ज्यांचं वय 25 आणि 27 वर्षे आहे. चौकशीनंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आलं.
एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आरोपी त्यांच्या पालकांसोबत पोलीस ठाण्यात आले होते आणि एक दिवस इथेच राहिले. त्यांच्या कुटुंबीयांनीही मुलांकडून चूक झाल्याची कबुली देत भविष्यात असं पुन्हा घडणार नाही, असं आश्वासन दिलं. यानंतर दोन्ही आरोपींना नोटीस देऊन सोडून देण्यात आलं.
दरम्यान यानंतर निमिषाने पोलिसांचे आभार मानणारा व्हिडीओही पोस्ट केला आहे. तसंच अशा घटनेची तक्रार करणं, त्या सगळ्यांसमोर आणणं ही आपली जबाबदारी असल्याचं म्हणत तिने इतरांनाही अशा गोष्टी शांतपणे हातळा, तुम्ही कायदा हातात घेऊ नका पण कायदेशीर मार्गाचा अवलंब करा, तक्रार करा असं आवाहन केलं आहे.
