वेळेचं गणित बिघडलं, म्हणून रजा घेतोय!
किरण गायकवाडने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत, त्यासोबत एक कॅप्शन लिहिले आहे. या पोस्टमध्ये त्याने सोशल मीडियापासून दूर जात असल्याचे सांगितले. त्याने असे करण्याचा निर्णय का घेतला याबाबत स्पष्ट कारण दिले आहे. किरणने पोस्टमध्ये म्हटलंय, "सोशल मीडिया चांगली आहे पण योग्य वेळ वापरता आली तर. माझा खूप वेळ सोशल मीडियावर जातोय, असं लक्षात आलं. म्हणून जरा काही काळासाठी (कायमचा नाही) माझ्या ऑफिशियल हँडल्स वरून रजा घेतोय... भेटूया लवकरच. खूप खूप प्रेम."
advertisement
या पोस्टसोबत त्याने #socialmediadetox हा हॅशटॅगही वापरला आहे, ज्यामुळे तो खरोखरच सोशल मीडियाच्या व्यसनापासून ब्रेक घेत असल्याचे दिसत आहे.
ब्रेक घेण्यामागे सिनेमाचे कारण?
किरण गायकवाडने अचानक ब्रेक घेण्याच्या या निर्णयाने चाहते नाराज असले, तरी अनेक चाहत्यांनी यामागे त्याचे आगामी व्यावसायिक काम असण्याची शक्यता वर्तवली आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत किरण गायकवाडने आपल्या दिग्दर्शन आणि लेखनाच्या पदार्पणाबद्दल सांगितले होते. किरण म्हणाला होता, "आता निगेटिव्ह खूप झालं आहे, त्यामुळे म्हटलं आता थांबूयात आपण. मी स्वतःचा सिनेमासुद्धा लिहिला आणि त्याचं दिग्दर्शनसुद्धा झालंय. 'FIR No 469' नावाचा सिनेमा मी दिग्दर्शित केला आहे. माझी जी काही तळमळ, खदखद आहे, ती आता मी लेखणीतून कागदावर उतरवली आहे. पुढच्या वर्षी त्या सिनेमाची घोषणा करेन."
किरणने सोशल मीडियापासून दूर राहून त्याच्या आगामी सिनेमाच्या पोस्ट-प्रोडक्शनवर किंवा प्रमोशनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा ब्रेक घेतला असावा, असा अंदाज लावला जात आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट्समध्ये त्याला लवकर परत येण्याची विनंती केली आहे, तर काहींना ही केवळ त्याची गंमत वाटत आहे.
