सरकारने चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी आणि विदर्भात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रामटेक तालुक्यातील नवरगाव परिसरात चित्रनगरी उभारण्याचा प्रस्ताव आहे. 60 एकर जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.. चित्रनगरी उभी राहिल्यास विदर्भात चित्रपट, वेब सिरीज आणि मालिकांच्या चित्रीकरणाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
advertisement
( नितीन गडकरींचा पुणेकरांना 50 हजार कोटींचा 'बूस्टर डोस'! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 'मेगा प्लॅन' जाहीर )
या अर्थसंकल्पात आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. महाकवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नव्या पिढीला कालिदासांचे साहित्य आणि त्यांचे कार्य समजावे या उद्देशाने हा चित्रपट तयार केला जाणार आहे. तसेच रामटेक विकास आराखडा टप्पा-2 अंतर्गत विविध विकासकामेही हाती घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
रामटेक परिसराचं वैशिष्ट्य
रामटेक हा परिसर निसर्गसंपन्न आहे. तिथे अनेक ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळे आहेत. दाट जंगल, तलाव आणि टेकड्यांनी नटलेला हा परिसर चित्रीकरणासाठी अत्यंत अनुकूल मानला जातो. रामटेकगडवरील राम मंदिर, तोतलाडोह आणि पेंच धरण, नगरधन किल्ला तसेच पेंच जंगल यांसारखी पर्यटनस्थळे येथे आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीसाठी हा परिसर आकर्षक ठरू शकतो.
आजपर्यंत चित्रपट आणि मालिकांसाठी कलाकारांना मुंबईकडे धाव घ्यावी लागते. मात्र रामटेक येथे चित्रनगरी उभारल्यास मध्य भारतातील कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मात्यांसाठी हे ठिकाण सोयीचे ठरू शकते. तसेच पर्यटन आणि अॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठीही हा परिसर उपयुक्त असल्याने भविष्यात येथे मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
