अभिजीत केळकरची जळजळीत पोस्ट
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करण्याचा प्रयत्न केला. या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे. याच वादावर आपली प्रतिक्रिया देताना अभिजीत केळकरने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर एक जळजळीत पोस्ट शेअर केली.
advertisement
अभिजीतनं लिहिलंय, "आज महाराज असते तर अशांना 'टिपू'न 'टिपू'न मारले असते..." अभिजीतने त्याच्या पोस्टमध्ये कोणताही थेट उल्लेख केला नसला, तरीही त्याने एका वाक्यात त्याने टिपू सुलतानचं नाव वापरून तुलना करणाऱ्यांना आरसा दाखवला आहे, असं म्हणत नेटकऱ्यांनी अभिजीतच्या या भूमिकेचं जोरदार समर्थन केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
मालेगावमध्ये टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद सुरू असताना, पत्रकारांनी हर्षवर्धन सपकाळ यांना प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, "ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी शौर्य गाजवलं, त्यांचाच आदर्श घेऊन टिपू सुलतानाने इंग्रजांविरुद्ध लढा दिला. त्यामुळे शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानला शिवाजी महाराजांच्या समक्ष पाहिलं पाहिजे." या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सपकाळांवर कडक शब्दांत टीका केली. "मतांसाठी इतके जोडे चाटताना मी कोणाला पाहिलं नाही. शिवरायांनी हिंदूंना मुघलांच्या जाचातून सोडवलं, तर टिपूने हिंदूंच्या कत्तली केल्या. या दोघांची तुलना करणं निंदनीय आहे," असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं.
राजकीय वादात कलाकारांची एन्ट्री
अभिजीत केळकर हा केवळ अभिनयासाठी नाही, तर सामाजिक आणि राजकीय विषयांवर व्यक्त होण्यासाठी ओळखला जातो. यापूर्वीही अनेकदा त्याने चुकीच्या प्रथांवर आणि विधानांवर सडेतोड भाष्य केलं आहे. टिपू सुलतान आणि शिवरायांच्या या तुलनेमुळे केवळ राजकारणच नाही, तर मराठी कलाविश्वही ढवळून निघालं आहे. शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना आणि टिपूची धोरणं यात जमीन-अस्मानाचा फरक असताना ही तुलना कशासाठी, असा सवाल आता सामान्य जनताही विचारत आहे.
