तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगा हा 10वी चा विद्यार्थी आहे. तो इन्स्टाग्रामवर एका मुलीच्या नावाने तयार करण्यात आलेल्या अकाऊंटसोबत चॅट करायला लागला. काही दिवस चॅटिंग झाल्यानंतर आरोपींनी आपण प्रेमसंबंधात आहोत, असं पटवून दिलं आणि विश्वास संपादन केला. यानंतर मुलाला कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरात भेटण्यासाठी बोलावलं.
अल्पवयीन मुलगा चॅटला भाळला आणि कॅबने कल्याण पूर्वमध्ये दाखल झाला. यानंतर चौघांनी त्याचं अपहरण केलं आणि एका निवासी इमारतीतील खोलीमध्ये त्याला बंद केलं. त्यानंतर आरोपींनी मुलाच्या कुटुंबाला संपर्क साधला आणि 20 लाख रुपयांची मागणी केली. कुटुंबावर दबाव आणण्यासाठी त्यांनी व्हॉट्सअॅपवर व्हॉइस मेसेजही पाठवले.
advertisement
घटनेची माहिती मिळताच अल्पवयीन मुलाच्या पालकांनी पोलिसांना कळवले. यानंतर पोलिसांनीही तातडीने कारवाई करत तांत्रिक तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता नांदिवली परिसरात अल्पवयीन मुलाला सोडणाऱ्या कॅब ड्रायव्हरचा शोध घेतला. कॅब ड्रायव्हरची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे, पोलिसांनी नांदिवलीमधील एका खोलीवर छापा टाकला आणि मुलाला सुरक्षितपणे बाहेर काढले.
24 तासांच्या आत पोलिसांनी या प्रकरणातल्या चारही आरोपींना अटक केली आहे. चौघांचीही ओळख पटलेली असून त्यांच्याविरोधात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने चारही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पालकांना आणि तरुणांना सोशल मीडियावर सावधगिरी बाळगण्याचे आणि ऑनलाईन अनोळखी लोकांशी मैत्री करण्याच्या धोक्यांबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.
