कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली उदंचन केंद्रामार्फत उल्हास नदीतून पाणी उचलून 150 दशलक्ष लिटर नेतिवली जलशुध्दीकरण केंद्राद्वारे पाणी शुद्ध करून डोंबिवली पूर्व व पश्चिम विभागास पाणी पुरवठा केला जातो. केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत अमृत 2.0 योजनेअंतर्गत खंबाळपाडा परिसरात बांधण्यात आलेल्या उंच जलकुंभाचे इनलेट मुख्य जल वाहिनीस जोडणी केलेल्या टॅपिंगच्या ठिकाणी पाणी गळती होत असल्याने सदर गळती थांबविण्यासाठी पॅच क्लॅम्प काढून काही दुरूस्ती करून पुन्हा बसवायचे आहे.
advertisement
दुरूस्तीचे काम करण्यासाठी मंगळवार दि. 30 डिसेंबर 2025 रोजी, सकाळी 09:00 ते रात्री 09:00 वाजेपर्यंत 12 तास नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामधून डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागामध्ये होणारा पाणी पुरवठा बंद राहणार (शट डाऊन) आहे. महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून नागरिकांना सोमवारी किंवा मंगळवारीच पाणी भरून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय, पाणी पुरवठा बंद राहिल्याच्या दुसऱ्यादिवशी पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच, डोंबिवली पूर्व आणि पश्चिममधील नागरिकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली.
