डोंबिवली : डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटनेची माहिती समोर आलेली आहे. जिथे पाणीटंचाईच्या समस्येला कंटाळून एका दिव्यांग वयोरुद्ध व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या काही वर्षात कल्याण-डोंबिवली परिसरातील काही भागात पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.
advertisement
पाणी टंचाईच्या समस्येन कल्याण-डोंबिवलीतील जनता हैराण
डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण परिसरातील पाणीटंचाई आता नागरिकांच्या सहनशक्तीपलीकडे गेली आहे. आठ दिवसांपासून घरात ना पिण्यासाठी किंवा ना अंघोळीसाठी आणि दैनंदिन गरजांसाठी पाण्याचा एक थेंबसुद्धा मिळत नाही, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या तीव्र टंचाईचा मानसिक ताण इतका वाढला की एका दिव्यांग वयोवृद्धाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
पाणी न येत असल्याने वृद्धाचा धक्कादायक निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरात (वय67) वर्षीय काशीनाथ सोनावणे हे वास्तव्यास आहेत. अनेक दिवसांपासून पाणी टंचाईच्या समस्येने ते त्रस्त झाले होते. अखेर ही समस्या वृद्ध व्यक्तीच्या सहनशक्तीपलीकडे गेली आणि त्यांनी थेट सोसायटीच्या गच्चीवर जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न केला सुदैवाने, सोसायटीमधील एका तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. त्या तरुणाने सोनावणे यांना वेळीच पाहिले त्यांची समजूत काढली आणि खाली आणले.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी एमआयडीसीच्या निष्क्रिय कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या आठवडाभरापासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने लोकांनी थेट कार्यालयात धाव घेतली होती. मात्र, अधिकाऱ्यांकडून फक्त थातूरमातूर उत्तरे मिळाली.
या घटनेनंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागावर जबरदस्त दबाव निर्माण झाला आहे. नागरिकांनी तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून प्रशासनाने तत्काळ पावले उचलली नाहीत तर मोठा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
