कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरामध्ये, रिद्धी खाणावळ आहे. या खाणावळीमध्ये काही नेपाळी लोकं कामाला आहेत. त्यांच्यामध्ये आणि काही तरूणांमध्ये मराठी भाषा बोलण्यावरून वाद झाला. मराठी भाषा येत नाही, या कारणावरून खाणावळीत नशेखोर तरुणांच्या टोळक्याने भयानक तोडफोड केली. तसेच खाणावळीतील दोन कर्मचार्यांवर हल्ला चढवून त्यांना बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीसांनी गुन्हा (FIR) दाखल केला असून घटनेला 24 तास उलटूनही आरोपींना अटक झालेली नाही. खाणावळीमध्ये तोडफोड करणारे हे तरूण मद्यपी असल्याचं कळतंय.
advertisement
गेल्या सहा महिन्यांपूर्वी चक्कीनाका परिसरामध्ये, एका व्यक्तीने रिद्धी खाणावळ नावाचं फूड कॉर्नर उघडलं. जिथे चायनीज आणि फास्ट फूड खायला मिळतं. दुकानमालकाचं नाव, संदीप आढाव असं आहे. संदीप यांच्या दुकानात नेपाळी कर्मचारी कामाला आहेत. ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात आधी एक तरूण दुकानात आला. त्याने दुकानातून वडापाव खायला घेतला. त्याच्यात आणि कर्मचार्यामध्ये पैशांवरून काही किरकोळ वाद झाला. खाणावळीतील कर्मचारी हिंदीमध्ये बोलत असल्याने त्या तरुणाने कर्मचार्याला 'तुला मराठी येत नाही का?' असे विचारले. कर्मचार्याने, 'मी काही महिन्यांपूर्वीच नेपाळहून आलो आहे आणि मराठी शिकत आहे,' असे उत्तर दिले. हे ऐकून संतप्त झालेल्या तरुणाने आपल्या अन्य 3 मित्रांना बोलावून घेतले. हे चौघंही दारूच्या नशेत होते.
दुकानातील कर्मचाऱ्याला मराठी येत नसल्यामुळे, नशेत असलेल्या चारही तरूणांनी दुकानाची तोडफोड केली. त्यासोबतच दोन कर्मचाऱ्यांनाही त्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण करून आणि खाणावळीचे नुकसान करून हे चारही तरुण तेथून पळून गेले. घडलेल्या प्रकारावर दुकान मालकाने संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, " कसेबसे पैसे जमवून 6 महिन्यांपूर्वी आम्ही पैसे गोळा करून हा बिझनेस सुरू केला होता. मी स्वत: मराठी भाषिक आहे, मराठी माणूस व्यवसाय करतोय, त्याला जगू द्या. दुकानामध्ये कर्मचारी नेपाळी आहेत, पण ते मराठी शिकत आहेत. मारहाण करणारे हे तरुण नेहमीच परिसरात गोंधळ घालतात आणि नागरिकांना त्रास देतात. या नशेखोर तरुणांना पोलिसांनी कठोर धडा शिकवायला पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या कोणासोबत असे कृत्य करण्याची त्यांची हिंमत होणार नाही."
दरम्यान, घटनेला 24 तास उलटून गेले आहेत, तरीही पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही. घटनेप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात त्या 4 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत," असे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, घटनेला एवढा वेळ उलटूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही, अशी माहिती आढाव यांनी दिली.
