कोयता टोळीची पुन्हा दहशत
डोंबिवलीतील मोठागाव परिसरात सुरू असलेली दहशतीच्या घटना दिवसेंदिवस भीषण स्वरूप धारण करत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सात जणांची टोळी परिसरात फिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी पोलिसांकडे वारंवार केल्या होत्या. हातात कोयते, लोखंडी रॉड आणि बांबू घेऊन ही टोळी कोणालाही विनाकारण धमकावत फिरत असल्याची माहितीही समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या तरुणांच्या टोळीने परिसरात निर्माण केलेल्या भीतीमुळे नागरिक दहशतीतच घराबाहेर पडत होते. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेनं परिस्थिती किती भितीदायक झाली आहे ते समोर आले आहे.
advertisement
उद्यानात बसलेल्या तरुणावर हल्ला
गेल्या आठवड्यात या टोळीने हर्षद अहिरे (वय 23) या तरुणावर जीवघेणा हल्ला केला. हर्षद कोणत्याही वादात नसतानाही फक्त दहशत माजवण्यासाठी या टोळीने त्याला लक्ष्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हर्षदचा मित्र तानाजी सनस यांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही एका उद्यानात गेले असताना अचानक मोटारसायकलीवरून आलेल्या सात जणांनी हर्षदला पकडले. कोणताही संवाद न करता या सातही जणांनी त्याला शिवीगाळ करत बांबूने बेदम मारहाण सुरू केली. धक्कादायक म्हणजे काही सेकंदांतच त्याच्यावर कोयत्याने वार केले. परिसरात ओरडत पळून जाणाऱ्या तानाजीने मदत मागण्याचा प्रयत्न केला पण टोळीच्या भीतीने कोणीही पुढे सरसावले नाही.
घटनेनंतर हर्षद गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळला. डोक्यावर आणि पाठीवर खोल जखमा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक झाली. घटना स्थळावरुन तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्याच्या आता उपचार सुरु आहेत. दरम्यान नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतरही टोळीवर कारवाई न झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आता पोलिसांनी या सातही आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला असून मोठागाव परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
