कल्याण पश्चिमेमध्ये मोहन प्राईड या हाय प्रोफाईल इमारतीमध्ये राहणाऱ्या संजित बाविस्कर यांच्या मुलीचं आज (18 जानेवारी) लग्न होतं. पण हळदीच्या दिवशी अपरिचित घडल्यामुळे वधूच्या वडिलांना आपल्या लेकीचं लग्न रद्द करावा लागलं आहे. लग्न रद्द झाल्याने वधूला मोठा मानसिक धक्का बसला आहे. हळदीच्या जेवणामध्ये विषबाधा झाल्यामुळे वधूच्या कुटुंबियांकडून संबंधित कॅटरर्सवर गुन्हा दाखल करुन त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली जात आहे. विषबाधा झालेल्यांवर कल्याण पश्चिमेतील वेगवेगळ्या हॉस्पिटल्सध्ये उपचार सुरु आहेत.
advertisement
वधूच्या वडीलांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर कॅटरर्सचा मालक राज विलास पराते याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल (17 जानेवारी) हळदीचा समारंभ होता. यामध्ये वधुकडील पाहुणे मंडळी जेवत होते. जेवल्यानंतर घरी परतल्यानंतर अचानक 40 ते 50 जणांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. ज्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला आहे, त्यांना कल्याणसह, अंबरनाथ आणि मुरबाडच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वधूकडील नातेवाईकांसोबतच कॅटरर्सच्या काही लोकांनाही विषबाधा झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हळदीच्या जेवणामध्ये विषबाधा झालेल्यांमध्ये वधूची आई रेखासोबत त्यांच्या बहिणीचाही समावेश आहे. वधूला या घटनेचा जबर मानसिक धक्का बसल्याने आजचे लग्न रद्द करण्याची वेळ बाविस्कर कुटुंबियांवर आली आहे. वधूचे वडिल संजित बाविस्कर यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. कॅटरर्सविरोधात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे कल्याणसह आजूबाच्या शहरांमध्येही एकच खळबळ उडाली आहे.
