बदलापूरवरुन मुंबईला नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना दररोज प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. सकाळी 6 ते 10 या वेळेत बदलापूरहून सुटणाऱ्या लोकलमध्ये प्रचंड तुफान गर्दी होते. त्यामुळे या वेळेत आणखी लोकल फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी खासदार सुरेश म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. मात्र, रेल्वेने म्हात्रे यांच्या पत्राला उत्तर देताना सध्या अधिक लोकल चालवणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
advertisement
3 नोव्हेंबरला दिलेल्या पत्राला रेल्वेने 28 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रत्युत्तरात काही महत्त्वाची कारणे नमूद केली आहेत. कल्याण- कर्जत मार्गावर रोज तब्बल 242 गाड्या धावत आहेत. यात लांब पल्याच्या गाड्या, उपनगरी लोकल सेवा आणि मालगाड्यांचा समावेश आहे. सध्याच्या घडीला हा संपूर्ण मार्ग दिवसभर 100 टक्के क्षमतेने वापरला जात आहे. त्यामुळे सकाळी किंवा इतर कोणत्याही वेळेत अतिरिक्त लोकल सेवा चालवणे सध्या अशक्य असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.
रेल्वे प्रशासनाच्या मते तिसरी-चौथी मार्गिका पूर्ण झाल्यावर आणि कल्याण स्टेशन यार्डचे रिमॉडेलिंग काम संपल्यानंतरच बदलापूर पट्ट्यात अधिक लोकल फेऱ्यांचा विचार करता येणार आहे. तोपर्यंत बदलापूरकरांना गर्दीतूनच प्रवास करावा लागणार आहे. सध्या 6 ते 10 दरम्यान एकूण 16 लोकल फेऱ्या बदलापूर ते सीएसएमटी चालतात. त्यापेक्षा जास्त फेऱ्या वाढवणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचे रेल्वेच्या पत्रातून स्पष्ट झालं आहे.
