मुंबई-लातूर प्रवास होणार कमी वेळेत
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्गाचे प्रस्ताव तयार केले आहेत. सध्या कल्याण ते लातूर प्रवासाला 10-11 तास लागले जातात पण हा महामार्ग तयार झाला की हे अंतर फक्त चार तासांत पार करता येईल. हा महामार्ग 442 किमी लांबीचा असणार असून अद्याप कागदावर आहे.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपूरमध्ये एमएसआरडीसीच्या प्रकल्पांच्या आढावा बैठकीत या महामार्गाला तत्त्वत मंजुरी दिली आहे. यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी आता शक्य झाली आहे. एमएसआरडीसी या प्रकल्पासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पाठवणार आहे आणि मंजुरी मिळाल्यानंतर आराखड्याचे काम सुरू होईल.
कसा अन् कुठून असणार मार्ग?
एमएसआरडीसी राज्यभरात एकूण 4217 किमी लांबीच्या रस्त्यांची उभारणी करणार आहे. या योजनेत कल्याण-लातूर द्रुतगती महामार्ग ही महत्वाची योजना आहे. हा महामार्ग कल्याण येथून सुरू होईल. त्यानंतर माळशेज घाटातून पुढे अहिल्यानगर, बीड, मांजरसुंबा, अंबेजोगाईवरून लातूरपर्यंत जाईल. लातूर नंतर हा महामार्ग महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळ संपेल. माळशेज घाटात 8 किमी लांबीचा बोगदा बांधला जाणार आहे.
हा महामार्ग विरार आणि अलिबाग यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी बहुउद्देशीय मार्गाने जोडला जाईल. या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून वाहतूक सुलभ होईल तसेच या मार्गावर अनेक प्रकल्प आणि विकासकामांना चालना मिळेल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासह शक्तिपीठ महामार्गसह इतर रस्ते प्रकल्पांचा आढावा घेतला. या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील रस्ते नेटवर्क अधिक प्रभावी होईल. या महामार्गामुळे व्यापारी, प्रवासी आणि वाहनचालकांसाठी मोठा फायदा होणार आहे.
