डोंबिवली : डोंबिवलीत पुन्हा एकदा प्रदूषणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. जिथे शहराच्या एमआयडीसी परिसरात चक्क रस्ता गुलाबी रंगाचा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हा प्रकार पाहून नागरिकांमध्ये आनंद नाही, तर मोठी चिंता निर्माण झाली आहे. कारण याआधीही डोंबिवलीत अशा रासायनिक प्रदूषणाचे अनेक धक्कादायक प्रकार घडले आहेत.
advertisement
काय घडलं डोंबिवलीत?
डोंबिवली एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून निघणाऱ्या केमिकल्समुळे परिसरातील हवा, पाणी आणि पर्यावरणावर नेहमीच परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते. काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरव्या रंगाचा पाऊस पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर ऑरेंज ऑईल मिसळलेला पाऊसही पडल्याचे समोर आले होते. आता थेट रस्त्यावर गुलाबी रंगाचा थर दिसून येत आहे.
एमआयडीसीतील संपूर्ण रस्त्यावर गुलाबी रंगाचे केमिकल साचले असून रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारातही मोठ्या प्रमाणात केमिकल आढळले आहे. या केमिकलमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. या दर्पामुळे श्वास घेण्यास त्रास होत असून आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे 2020 सालीही असाच गुलाबी रस्त्याचा प्रकार समोर आला होता. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. मात्र पाच वर्षांनंतर पुन्हा तोच प्रकार घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी तरी संबंधित अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे गांभीर्याने लक्ष देणार का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
अशा सतत घडणाऱ्या रासायनिक प्रदूषणामुळे डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे
