नेवाळीतील ट्रॅफिकची समस्या कायमची संपणार
बदलापूरला ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईशी जोडणाऱ्या काटई-बदलापूर मार्गावरील नेवाळी नाका चौकात होणारी तीव्र वाहतूक कोंडी आता लवकरच कमी होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला उड्डाणपुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. यामुळे बदलापूर, अंबरनाथ आणि कल्याण परिसरातील नागरिकाना दिलासा मिळणार.
कसा असेल नवा उड्डाणपुल?
एमएमआरडीए यांच्या नुकत्याच मंजूर झालेल्या अर्थसंकल्पात या दुमजली उड्डाणपुलासाठी तब्बल 282 कोटी 87 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पुलावर एका मजल्यावर मेट्रो धावणार असून दुसऱ्या मजल्यावरून वाहनांची वाहतूक होणार आहे.
advertisement
काटई ते बदलापूर हा सुमारे 13 किलोमीटर लांबीचा आणि 14 मीटर रुंदीचा महत्त्वाचा मार्ग आहे आणि तो ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांना जोडतो. औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीसाठीही हा मुख्य रस्ता आहे. मात्र नेवाळी नाका येथे कल्याण-मलंगगड मार्ग आणि काटई-बदलापूर मार्ग एकत्र येत असल्याने येथे दररोज मोठी वाहतूक कोंडी होते.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एकत्रित मेट्रो आणि उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिक, कामगार आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होणार असून प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
