डोंबिवली शहरा जवळील खोणी ग्राम ग्रामपंचायतपदाची निवडणूक पार पडली. पण ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे सरपंचपदी ज्योती विश्वास जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. ज्योती विश्वास जाधव या ठाकरे गटाच्या पुरस्कृत उमेदवार होत्या. जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सरपंचपदी निवड झालेल्या ज्योती विश्वास जाधव यांचं सत्कार केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. आता श्रीकांत शिंदे यांच्याच मतदारसंघात ठाकरे गटाने खातं उघडल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.
advertisement
दरम्यान, ठाकरे गटाच्या विजयावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आली. डोंबिवली येथील खोणी ग्राम पंचायत निवडणूक पार पडली. ज्योती जाधव विजयी झाल्या. ज्योती जाधव या आता सरपंचपदी विराजमान होणार आहे. पण ज्योती जाधव यांना विजयी करण्याचा निर्णय हा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने घेतला होता. त्यानंतर आम्ही सगळ्या सदस्यांनी घेतला होता. गेल्या ६५ वर्षांच्या इतिहासामध्ये खोणी गावात कुणीही दलित समाजाचा सरपंच झाला नाही. त्यामुळे दलित समाजाला न्याय देण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी निर्णय घेतला होता. पण. काही लोक अप्रचार करत आहे आणि उद्धव ठाकरे गटाचे नाव देत आहे, अशी प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख महेश पाटील यांनी दिली.
उद्धव ठाकरेंनी फोन करून केलं अभिनंदन
तर, ठाकरे गटामध्ये मात्र जल्लोषाचं वातावरण आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील खोणी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ज्योती विश्वास जाधव ह्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. भ्रमणध्वनीद्वारे त्यांचं अभिनंदन करत पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा अभिनंदनपर कार्यक्रम देखील पार पडला.
सदर निवडणुकीत शिवसेनेच्या संघटित कार्यप्रणालीमुळे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या बळावर खोणी ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा अभिमानाने फडकला आहे. हा विजय म्हणजे पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असल्याचे मानले जात आहे.
हा विजय म्हणजे जनतेच्या विश्वासाचा आणि पक्षाच्या संघटनेच्या बळाचा विजय आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील, असा निर्धार यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.
मनसेचाही मोठा वाटा
तर, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेशदादा पाटील यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली होती, अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिली.
